सोसायट्या आक्रमक : उच्च न्यायालयात दाखल करणार जनहित याचिका
पिंपरी – शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना पाणी अपुरे पडत असल्याने सोसायटीधारकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. दसरा झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनच्या वतीने पाणी प्रश्नासह अन्य विविध मागण्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे.
पवना धरण पूर्ण भरले असतानाही पाणी कपात आणि रोजच्या पाणी टंचाईने सोसायटीधारक त्रस्त झाले आहेत. शहरात एकूण 3 हजार 869 सोसायट्या आहेत. त्यातील मोठ्या सोसायट्या या सुमारे 300 आहेत. मोठ्या सोसायट्यांना उन्हाळ्यात दिवसाला 30 टॅंकर पाणी लागत होते. सध्या हे प्रमाण निम्म्यावर म्हणजे 15 टॅंकरपर्यंत आले आहे. छोट्या सोसायट्यांना तुलनेत तीन ते चार टॅंकर लागत आहे. मोठ्या सोसायट्यांना साडेपाच ते सव्वासात लाख इतका मासिक खर्च केवळ पाणी टॅंकरसाठी करावा लागत आहे.
महापालिकेने प्रति व्यक्ती 135 लिटर इतके पाणी देणे अपेक्षित आहे. मात्र, महापालिकेकडे सक्षम पाणीपुरवठा यंत्रणेचा अभाव असल्याने त्याची पूर्तता होताना दिसत नाही. फेडरेशनतर्फे 2017 मध्येच पाणी प्रश्नावर जनहित याचिका दाखल करण्यात येणार होती. मात्र, महापालिका प्रशासनाने हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्या वेळी याचिका दाखल केली नव्हती. तथापि, अद्यापही हा प्रश्न सोडविला नसल्याने आता जनहित याचिका दाखल करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. याबाबत फेडरेशनच्या वार्षिक सभेत ठराव मंजूर झाला आहे. सुधीर देशमुख यांनी त्याचा मसुदा तयार केला आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुदेश राजे यांनी दिली.
सोसायटीधारकांना भेडसावणाऱ्या पाणी प्रश्नासह अन्य प्रमुख प्रश्नांच्या सोडविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दसरा झाल्यानंतर जनहितयाचिका दाखल करणार आहे. जनहित याचिकेसोबत गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये सोसायट्यांनी भरलेली टॅंकरची बिले जोडण्यात येणार आहे. महापालिका करीत असलेल्या पाणी पुरवठ्याची आकडेवारी आम्ही गोळा केलेली आहे. महापालिका प्रशासनाकडे वाढलेल्या लोकसंख्येनुसार लागणाऱ्या पाण्याचे नियोजन नाही. त्यामुळेच मुख्यत्वे सोसायट्यांना पाणी प्रश्न भेडसावत आहे.
– सुदेश राजे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन.