आर.आर.पाटील यांच्या कन्येचा आदित्य ठाकरेंना टोला
मुंबई : राज्यातील आगामी निवडुणकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आता प्रचाराच्या मैदानात उतरून एकमेकांवर टीका करण्याच्या तयारीत आहेत. त्यातच आता यंदा सत्तांतर होणार असल्याने आदित्य ठाकरे यांना संधी मिळणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी आधी चांगल काम करून दाखवावं, त्यानंतरच उपमुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पहावे, असा टोला आर.आर.पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी लगावला.
आर.आर.पाटील यांनी राज्यात गुटखाबंदी, डान्सबारबंदी केली. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांचे सरकार उद्योगधंदे बंद करून युवकांना बेरोजगार करत आहे. आघाडीच्या सरकारने अनेक चांगल्या योजना राबविल्या. त्याच योजनांची नावं बदलण्यात हे सरकार धन्यता मानत आहे. सध्या माय-भगिनींवर बलात्काराचं प्रमाणही वाढलं आहे. सरकार केवळ सत्तेचा दुरूपयोग करून विरोधी पक्षांना संपवण्याचं काम करत आहे. परंतु जनतेला सर्व कळत आहे. त्यामुळे यंदा सत्तांतर अटळ असल्याचे स्मिता पाटील म्हणाल्या. एका वर्तमानपत्राशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. यावेळी सहानुभूतीवर नाही तर विकासाच्या मुद्द्यावर आपल्या आई विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.