कमलेश गिरी
डेन्मार्कशी भारताचे द्विपक्षीय संबंध अनेक दशकांपासून असून वेळोवेळी त्यात सुधारणा झालेली आहे. डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी नुकताच भारत दौरा केला. या दौऱ्यात ऐतिहासिक, औद्योगिक, व्यापारी संबंध, सर्वमान्य लोकशाही परंपरा आणि अन्य क्षेत्रांत परस्पर सहकार्य आणि विचारांचे आदानप्रदानबरोबरच आंतरराष्ट्रीय शांतता व स्थैर्यावर भर देण्यात आला.
डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांचा तीन दिवसांचा भारत दौरा नुकताच पार पडला. हा दौरा सर्वार्थाने महत्त्वाचा होता. कारण या भेटीतून दोन्ही देशांत द्विपक्षीय संबंध दृढ होण्याबरोबरच व्यापारी दृष्टिकोनातूनही सहमती झाली. या आधारावर भारत आणि डेन्मार्क यांच्यातील आयात निर्यातीला चालना मिळणार आहे. करोना काळात थंडावलेली वार्ता पुन्हा सुरू झाल्याने द्वीपक्षीय संबंधांना नवीन परिमाण लाभले आहे.
मेटे फ्रेडरिक्सन यांनी अक्षय ऊर्जा, उद्योग, गुंतवणुकीसह द्विपक्षीय संबंधांच्या नव्या संकल्पनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत चर्चा केली. भारत दौऱ्याबाबत त्यांना कमालीची उत्सुकता होती आणि ती दौऱ्यात दिसून आली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. माध्यमांना त्या संयुक्त रूपाने सामोरे गेल्या तेव्हा त्यांनी मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. जगासाठी मोदी हे प्रेरणादायी व्यक्ती असून देश आणि जगासाठी दूरदृष्टी बाळगणारे नेते, असे गौरवोद्गार काढले.
डेन्मार्क हा अनेक वर्षांपासून नि:स्वार्थी भावनेतून जगासाठी, जनतेसाठी स्वच्छ पाणी आणि स्वच्छ ऊर्जा देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. डेन्मार्कच्या योगदानाबद्दल भारत सरकारने नेहमीच कौतुक केले आहे आणि जगातील अन्य देश देखील डेन्मार्कच्या कामाचे कौतुक करत आहेत. विशेष म्हणजे भारत आणि डेन्मार्क यांच्यातील धोरणात्मक पातळीवरचे संबंध अनेक वर्षांपासून असून ते सुरळीत राहिले आहेत. यात सांस्कृतिक आणि व्यापारी क्षेत्राचाही समावेश आहे. दोन्ही देश अनेक दशकांपासून औद्योगिक क्षेत्रात भागीदार आहेत.
यादरम्यान उभय देशांसमोर अडचणींचे प्रसंग आले नाही. सध्याच्या काळात डेन्मार्कच्या दोनशेपेक्षा अधिक कंपन्या भारतात सक्रिय आहेत, तर भारताच्या देखील 60 ते 70 कंपन्या तेथे काम करत आहेत. व्यापारासाठी दोन्ही ठिकाणी पोषक वातावरण आहे. कोविड काळातही दोन्ही देशातील कंपन्या कोणत्याही अडथळ्याविना कार्यरत राहिल्या. सरकारकडून देखील प्रत्येक गरजांची भरपाई करून देण्यात आली.
भारत आणि डेन्मार्कच्या कंपन्या या स्वच्छ तंत्रज्ञान, शाश्वत ऊर्जा, कृषी आणि पशुपालन, पाणी आणि कचरा व्यवस्थापन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, डिजिटायजेशन, स्मार्ट सिटी, जहाजबांधणी आदी क्षेत्रात चांगल्या वातावरणात काम करत आहेत. दोन्ही बाजूंनी होत असलेल्या सहकार्याने ही बाब शक्य झाली आहे. मेटे फ्रेडरिक्सन यांची भारत यात्रा ही उभय देशातील संबंध वृद्धिंगत करण्यासाठीचे पुढचे पाऊल आहे. त्याचवेळी हरित धोरणात सहकार्य सुरू ठेवण्याची दोन्ही देशांनी तयारी केली आहे. हरित क्षेत्राला काळानुसार नवीन दिशा देण्याची गरज आहे.
यात स्वच्छ वातावरण, हवामान बदल, आपत्ती व्यवस्थापन आदी आघाडींवरील प्रयत्नांचा समावेश आहे. करोना काळानंतर संपूर्ण जग या दिशेने वाटचाल करत आहे. आजघडीला कोणताही मोठा नेता अन्य देशाच्या दौऱ्यावर असेल तर तो हरित मुद्द्याची आग्रहाने मांडणी करत आहे. अर्थात ही बाब गरजेची असून त्यावर मानवी जीवन अवलंबून आहे. पर्यावरणात होणारे बदल पाहता भारत डेन्मार्कने संयुक्त रूपाने हरित क्षेत्रात धोरणात्मक वाटचाल करण्यासाठी केलेले प्रयत्न स्पृहणीय आहेत.
या प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांचे द्विपक्षीय संवादाचे स्वागत केले आहे. हरित क्षेत्रात गती देण्यासाठी जगातील सर्वच देश एकत्र काम करत आहेत. या प्रकारचे प्रयत्न आशियायी देशातही सुरू करणे गरजेचे असून ते अत्यावश्यक आहे. डेन्मार्क-भारत यांच्यातील धोरणात्मक हरित कार्यास एक-दीड वर्षांपासून सुरुवात झाली आहे; परंतु करोना संकटामुळे या कामात अडथळे आले.
आता पुन्हा ते सुरू करण्यात येत आहे. या मुद्द्यावरून मेटे फ्रेडरिक्सन यांच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत बैठकीत चर्चा आणि आढावा घेण्यात आला. गेल्या वर्षी 28 सप्टेंबर 2020 मध्ये व्हर्च्युअल बैठकीच्या माध्यमातून शिखर बैठकीत भारत डेन्मार्कने हरित धोरण सहकार्याला हिरवा झेंडा दाखवला. अर्थात, या कामाचा व्यक्तिश: आढावा घेण्यासाठी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी डेन्मार्कचा दौरा देखील केला होता.
त्याचा प्रगती अहवाल त्यांनी पंतप्रधानांना सादरही केला. तूर्त मेटे फ्रेडरिक्सन यांनी आपल्या भारत दौऱ्यात दोन्ही देशादरम्यानच्या व्यापारी आणि परस्पर हिताशी निगडीत क्षेत्रात सर्वंकष चर्चा केली आहे. डेन्मार्कबरोबर भारताचे नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. व्यापार आणि गुंतवणुकीच्या आघाडीवर या संबंधांना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. त्याला आणखी गती मिळावी यासाठी दोन्ही देशांच्या पंतप्रधांनी पुढील दहा वर्षांसाठी व्यापारी ब्लू प्रिंट तयार केली आहे. पुढील दहा वर्षांत दोन्ही देश कोट्यवधींची गुंतवणूक करणार आहेत.
त्यातील सर्व करारावर सौहार्दपूर्ण एकमत झाले आहे. सध्या दोन्ही देशातील कंपन्यांची संख्या वाढवण्यावर भर देत आहेत. यात सर्वाधिक भर हा शाश्वत ऊर्जा, स्वच्छ तंत्रज्ञान, पाणी आणि कचरा व्यवस्थापन, कृषी आणि पशुपालन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, डिजिटायजेशन, स्मार्ट सिटी आणि जहाज बांधणी याचा समावेश आहे. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान फ्रेडरिक्सन म्हणाल्या की, डेन्मार्क हा भारताला खूपच जवळचा सहकारी मानतो.
यावरून डेन्मार्कच्या पंतप्रधानांचा भारत दौरा हा सकारात्मक झाल्याचे दिसून येते. अर्थात भारत आणि डेन्मार्क यांच्यात नियमितपणे करारमदार झाले आहेत आणि त्यात वेळोवेळी सुधारणा देखील करण्यात आल्या. तूर्त या भेटीनंतर दोन्ही देशातील संबंध आणखी दृढ होण्याची अपेक्षा बाळगली जात आहे.