मुंबई- भारतात चालू खात्यावरील तूट सतत वाढत हाती. अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हा चर्चेचा विषय राहिलेला आहे. आयात जास्त आणि निर्यात कमी या कारणांमुळे ही तूट वाढत असते. मात्र लॉक डाऊनच्या काळामध्ये आयात ठप्प झाल्यामुळे भारताची चालू खात्यावरील तूट संपुष्टात येणार आहे.
एवढेच नाही तर या खात्यावर भारताकडे 20 अब्ज डॉलर अतिरिक्त राहणार आहेत. आयातीपेक्षा निर्यात जास्त असा प्रकार याअगोदर 2007 या वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये घडला होता. त्यावेळी क्रुडचे दर कमी झाल्यामुळे भारताची आयात निर्यातीपेक्षा कमी झाली होती.
करोना व्हायरसमुळे बंदर आणि विमानसेवा बंद आहे. त्यामुळे आयात आणि निर्यातीचे व्यवहार ठप्प झाले आहे. एप्रिल महिन्यामध्ये निर्यात 60 टक्क्यांनी कमी झाली तर आयात 59 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यातच भारत सरकारने आत्मनिर्भर भारत हे धोरण स्वीकारायचे ठरविले आहे. त्यामुळे आगामी काळात आयात कमी करण्यासाठी सरकार चालना देणार आहे.