निती आयोग; दिवसाला घेतल्या जातात 50 हजार चाचण्या
नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशभर लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी केली. याचा सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. लवकरच संसर्गाची वाढ आटोक्यात येईल असा दावा निती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी केला आहे. पॉल म्हणाले की, या अगोदर 2 वेळा लॉक डाऊन करण्यात आले होते. त्याचा फायदा विखुरला जाऊ नये, याकरिता 4 मे नंतर पुन्हा लॉक डाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. आता ज्या ठिकाणी करोनाचा जास्त प्रादुर्भाव झालेला आहे, त्या ठिकाणी चाचण्या घेऊन हे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
केंद्र सरकारने कार्यान्वित केलेल्या वैद्यकीय उपकरण पुरवठा आणि व्यवस्थापन गटाचे नेतृत्व करत असलेले पॉल यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या कडक लॉक डाऊनमुळे भारतातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश मिळाले आहे. सामाजिक पातळीवर भारतामध्ये संसर्ग झाला आहे का असे विचारले असता ते म्हणाले की, तसे झाले असते तर रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असती.
इतर देशात ज्या वेगाने करोना व्हायरस वाढला आहे आणि मृत्यूचे प्रमाण जितके आहे त्यापेक्षा भारतातील परिस्थिती कितीतरी चांगली आहे. केंद्र आणि राज्य सरकारचा समन्वय आणि भारतीय जनतेने या उपाययोजनांना चांगला प्रतिसाद दिल्यामुळे हे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, लॉक डाऊनअगोदर 3 ते 5 दिवसाला रुग्णांची संख्या दुप्पट होत होती. आता हे प्रमाण 11 ते 12 दिवसावर आले आहे. हे लॉक डाऊनचे यश आहे. मात्र भारतासारख्या मोठ्या देशात आगामी काळातही अशा उपाययोजना कमी-अधिक प्रमाणात चालू ठेवाव्या लागणार आहेत.
भारतात चाचण्या कमी प्रमाणात घेतल्या जात आहेत असा आरोप होत आहे याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, भारतीय गरजांनुसार आम्ही चाचण्या घेत आहोत. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. आतापर्यंत भारतात 7 लाख चाचण्या घेण्यात आल्या आहेत. सध्या प्रत्येक दिवसाला 50 हजार चाचण्या घेतल्या जात आहेत. हा रोग अचानक उद्भवल्यामुळे यासाठीच्या वाचण्याची उपकरणे मर्यादित प्रमाणात उपलब्ध होती. आता ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यात आली आहेत.
लॉक डाऊननंतरही बरेच निर्बंध राहणार
विशिष्ट कालावधीनंतर लॉक डाऊन संपुष्टात येईल. त्यानंतर सर्व काही सुरळीत चालू राहील या भ्रमात कोणीही राहू नये. लॉक डाऊन संपुष्टात आल्यानंतरही सामाजिक अंतर ठेवणे, मास्क वापरणे, गर्दीचे कार्यक्रम न घेणे इत्यादी उपाययोजना चालू ठेवाव्या लागणार आहेत. त्याचबरोबर जे काम घरातून करता येणे शक्य आहे असे काम घरातून करण्याचे प्रमाण आगामी काळात वाढेल असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, सार्वजनिक सभा, धार्मिक कार्यक्रम बराच काळ बंद ठेवावे लागणार आहेत. भारतात आतापर्यंत करोना व्हायरसमुळे 1300 लोक मृत्युमुखी पडले आहेत. तर 40 हजार लोकांना संसर्ग झालेला आहे.