नवी दिल्ली – देशात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. आरोग्य व्यवस्था हतबल झाली असून आरोग्य सुविधांअभावी लोकांना प्राण गमवावे लागत आहेत. महाराष्ट्रातील स्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. मात्र देशातील इतर राज्यांत स्थिती हाताबाहेर गेली आहे. निवडणूक काळात उत्तर प्रदेशात ७०० शिक्षकांचा करोनाने मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. आता अलीगड विद्यापीठातील २६ प्राध्यापकांचा केवळ २० दिवसांत करोनाने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
अलिगढ मुस्लीम विद्यापीठामध्ये 26 प्राध्यापकांचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्याने विद्यापीठात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाचे कुलगुरू तारीक मनसुर यांच्या भावाचाही गेल्या आठवड्यात करोनामुळे मृत्यू झाला आहे.
कुलगुरू तारीक यांनी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चला (आयसीएमआरला) लिहून विद्यापीठातील करोना रुग्णांमधील करोना व्हिरिएंट अधिक घातक असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांनी विद्यापीठातील करोनाग्रस्त व्यक्तींच्या चाचण्या करुन येथील करोना विषाणूच्या जीनोम सिक्वेन्सचा अभ्यास करुन विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आढळलेल्या व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटसंदर्भात संशोधन करावं, अशी मागणी केली आहे.
अलिगढ मुस्लीम विद्यापीठामध्ये गेल्या 20 दिवसांमध्ये 26 प्राध्यापकांनी करोनामुळे आपला जीव गमावला आहे. यामध्ये 16 वर्किंग आणि 10 निवृत्त फॅकल्टी मेंबर्सचा समावेश आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या कँपसमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.