नवी दिल्ली – देशात एका बाजूला करोना प्रतिबंधात्मक लसीच्या तुटवड्याच्या तक्रारी होत असताना 11 एप्रिलपर्यंत देशांत 45 लाख डोस वाया गेल्याची बाब माहिती हाती आली आहे. केरळ आणि प. बंगालमध्ये एकही डोस वाया गेल्या नसल्याचे माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. विवेक पांडे यांनी ही माहिती मागवली होती. देशांत विविध राज्यांमध्ये 10 कोटी 34 लाख डोस वाटण्यात आले. त्यातील 44 लाख 78 हजार डोस वाया गेले, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे.
तमिळनाडू डोस वाया जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तेथे लसीच्या प्रत्येक 100 डोसपैकी 12 डोस वाया जातात. त्यापाठोपाठ हे प्रमाण हरियाणात सर्वाधिक आहे. तेथे हे प्रमाण 100 पैकी नऊ एवढे आहे. तर पंजाब. मणिपूर आणि तेलंगणात हे प्रमाण प्रती 100 डोस 8 इतके आहे.
राजस्थानात लस वाया जाण्याचे प्रमाण सहा टक्के असून एकूण 95 लाख जणांचे लसीकरण झाले आहे. गुजरातमध्ये लस वाया जाण्याचे प्रमाण 3.8 असून तेथे 90 लाख जणांना लस देण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये लस वाया जाण्याचे प्रमाण पाच टक्के असून तेथे 98 लाख जणांचे लसीकरण झाले आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण
केरळ, प. बंगाल, हिमाचल प्रदेश, मिझोराम, गोवा, दमण आणि दिव, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप येथे लस वाया जाण्याचे प्रमाण शून्य आहे. सर्वाधिक लसीकरण केलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक सर्वात वरचा आहे. तेथे एकूण देशात लसीच्या वापरापैकी 3.2 टक्के वापर झाला आहे. एकूण लाभार्थींची संख्या 99 लाखांच्या घरात आहे.