श्रीगोंदा – रविवारी एक महिला मुंबईहुन ऑनलाइन पास काढून श्रीगोंद्यात दाखल झाली. त्याच वेळी त्या महिलेच्या मुंबईत केलेल्या करोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची बातमी फोनवरून येऊन धडकली. यामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली. या महिलेला आता नगर येथे हलविण्यात आले आहे. याबाबत समजलेले वृत्त असे की, मुंबईत राहणाऱ्या या महिलेचे पती करोनामुळे मरण पावले आहेत. त्यामुळे तिच्या करोना तपासणीसाठी स्राव पाठविण्यात आला होता.
त्यानंतर ही महिला काही दिवस मुंबईत क्वारंटाइन होती. परंतु, करोना तपासणी अहवाल प्राप्त झालेले नसतानाच ती महिला रितसर ऑनलाइन पासेस काढून रविवारी आपल्या दोन मुलांसह श्रीगोंद्यातील एका गावात आली. ही महिला गावी दाखल होताच काही वेळात त्या महिलेचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती फोनवरून कळाली. यानंतर मात्र प्रशासनाची एकच धावपळ उडाली. अखेर रविवारी रात्री या महिलेला नगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, तेथेही त्या महिलेवर उपचार न करता तिला घरी पाठविण्यात आल्याची खात्रीशीर माहिती समजली. त्यानंतर सोमवारी पुन्हा या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, ही महिला श्रीगोंद्यात दाखल झाल्यानंतर काही वेळातच ती करोना बाधित असल्याचा फोन आला. यामुळे तिला नगर येथे हलविण्यात आले. यामुळे या महिलेचा तालुक्यातील स्थानिक लोकांशी अधिक संपर्क आला नाही, ही समाधानकारक बाब आहे. परंतु, श्रीगोंदेकरांनी फिजिकल डिस्टन्सिंगसह इतर सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक बनले आहे. श्रीगोंद्यात पहिला रुग्ण आढळल्याने धास्ती वाढली आहे. तसेच करोनाला थोपवण्याची जबाबदारीही वाढली आहे.
क्वारंटाईन असताना पासेस मिळाले कसे?
या महिलेच्या पतीचे मुंबईत करोनामुळे निधन झाल्याने तिचाही स्राव करोना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. या काळात या महिलेने जूनपर्यंत मुंबईत क्वारंटाइन राहणे बंधनकारक होते. शिवाय, करोना तपासणी अहवाल प्राप्त झालेला नसताना त्या महिलेला प्रवासासाठी अधिकृत पास मिळाला कसा? असा सवाल उपस्थित होत आहे.