नगर -जिल्ह्यात करोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अधिक गतिमान झाली आहे. अधिकाधिक चाचण्या करून, बाधितांना लवकर शोधण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्याचाच भाग म्हणून जिल्हा रुग्णालयातील करोना टेस्ट लॅबची क्षमता आता प्रतिदिन एक हजार चाचण्या एवढी करण्यात आली आहे.
त्यामुळे येथील चाचण्यांचा वेग वाढणार आहे. ज्यांना आजाराची लक्षणे असतील, बाधित रुग्णाच्या निकट संपर्कातील असतील, अथवा इतर गंभीर आजारांनी त्रस्त असतील, अशा व्यक्ती त्यांचे घशातील स्त्राव जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी देऊ शकणार आहेत. ज्यांना स्त्राव तपासणी करून घ्यावयाची आहे, त्यांनी ती करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
सध्या जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने “चेस दी व्हायरस’ हे लक्ष्य ठेवून रुग्णांपर्यंत पोहोचण्याची मोहीम आखली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भात आरोग्य यंत्रणा आणि सर्व तालुकास्तरीय यंत्रणांना निर्देश दिले आहेत. रॅपिड अँटिजेन चाचण्यांच्या माध्यमातून ही मोहीम गतिमान झाली आहे. आता जिल्हा रुग्णालयातील लॅबची क्षमता वाढल्याने प्रादुर्भाव रोखण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना अधिक गती मिळणार आहे.
ज्याठिकाणी बाधित व्यक्तींची संख्या जास्त आहे, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात तपासणी करुन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करुन करोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
लक्षणे जाणवणाऱ्या रुग्णांनी वेळीच स्त्राव तपासणी करून घेतली, तर त्यांना वेळीच उपचार देणे शक्य होणार आहे.
ज्यांना लक्षणे नाहीत, अशा करोनाबाधित रुग्णांनी जिल्हा रुग्णालयात येण्याएवजी त्यांच्या जवळच्या तालुकास्तरीय किंवा महानगरपालिका क्षेत्रातील कोविड केअर सेंटरमध्ये
दाखल व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. घरातील वृद्ध आणि बालके यांचा सार्वजनिक ठिकाणचा संपर्क टाळणे आवश्यक आहे. विनाकारण वाहने घेऊन रस्त्यावर येऊ नये. संसर्गाची ही साखळी तोडायची असेल, तर सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळा, अत्यावश्यक असेल, तरच घराबाहेर मास्क घालून बाहेर पडा, असे आवाहन जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी केले आहे.
जिल्ह्यात वाढले 435 नवे रुग्ण
जिल्ह्यात रविवारी (दि.2) सायंकाळी सहा वाजल्यापासून आज रुग्ण संख्येत 435 ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 2 हजार 890 इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज 263 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता 4 हजार 25 इतकी झाली. एकूण बाधितांची संख्या 6 हजार 346 झाली आहे.