नवी दिल्ली – देशात पहिली लाट आटोक्यात आल्यानंतर चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र दुसऱ्या लाटने देशात हाहाकार माजवला. दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणेचा कस लागला. यावर उपायोजना करण्यासाठी टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रेकिंगवर भर देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भारताने करोना टेस्टमध्ये आघाडी घेतली आहे. देशात एका दिवसांत सर्वाधिक करोना चाचण्या करण्याचा विक्रम झाला आहे.
देशात बुधवारी विक्रमी 20 लाख 55 हजार 10 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. हे केवळ भारतात नाही, तर संपूर्ण जगात एका दिवसात केल्या जाणाऱ्या चाचण्यांचा सर्वात मोठा आकडा आहे.
देशभरात आतापर्यंत 32 कोटी 23 लाख 56 हजार 187 सँपल टेस्ट करण्यात आले आहेत. यापूर्वी मंगळवारीही देशात विक्रमी 20 लाख 8 हजार 296 कोरोना टेस्ट करण्यात आल्या होत्या. तर 11 मे रोजीही 19 लाख 83 हजार 804 टेस्ट करण्यात आल्या होत्या, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
दरम्यान या महिन्याच्या अखेरीस 25 लाख टेस्ट आणि जून अखेरीस 45 लाख चाचण्या दररोज करण्याचे आमचे लक्ष्य असल्याचं आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलाराम भार्गव यांनी म्हटलं आहे.
दिल्लीत सर्वाधिक नमुने घेण्याचे प्रमाण असून 2.2 कोटी लोकसंख्येमागे सुमारे 1.8 कोटी चाचण्या झाल्या आहेत. त्यानंतर कर्नाटकचा क्रमांक आहे. येथे 6.6 कोटी लोकसंख्येमागे 2.8 कोटी चाचण्या घेण्यात झाल्या आहेत. दुसरीकडे उत्तर प्रदेशात 22.5 कोटी लोकसंख्येमागे सर्वाधिक 4.6 कोटी चाचण्या झाल्या आहेत. तर महाराष्ट्रात 3.2 कोटी चाचण्यात झाल्या आहेत.