पिंपरी गावातील कलापुरे कुटूंबियांवर शोककळा
पिंपरी – एकाच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तीन सख्या भावांचा करोनामुळे अवघ्या नऊ दिवसांत मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. करोनामुळे एकाच घरातील तिघांचा आणि तोही सख्या भावंडाचा बळी जाण्याची ही पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे पिंपरीगावातील कलापुरे कुटूंबावर शोककळा पसरली आहे.
पोपटराव कलापुरे (वय 66), ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कलापुरे (वय 63) आणि दिलीपराव कलापुरे (वय 61, सर्व रा. पिंपरीगाव) असे करोनामुळे मृत्यू झालेल्या तीन सख्ख्या भावंडांची नावे आहेत.
कलापुरे कुटूंबिय गेल्या चार वर्षांपासून पिंपरीगावात एकत्र राहत आहे. यापूर्वी ते खराळवाडी भागात राहण्यास होते. 5 जुलै रोजी त्यांच्या कुटूंबातील एका मुलास करोनाची लागण झाली. त्यांचे एकत्र कुटूंब असल्याने घरातील सर्व 18 जणांची करोनाची चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये कुटूंबातील सर्वचजण करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
पोपटराव, ज्ञानेश्वर आणि दिलीपराव या तिघांनाही ह्रदयासंबंधित आजार होते. आपल्याला करोना झाल्याची धास्ती या तिघांनीही घेतली. यापैकी दिलीप यांना प्रथम अतिदक्षता विभागात व्हॅन्टीलेटरवर ठेवण्यात आले. त्यानंतर पोपटराव आणि ज्ञानेश्वर यांनाही श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तिघांनाही अतिदक्षता विभागात व्हेन्टीलेटरवर ठेवण्यात आले. 10 जुलै रोजी उपचारादरम्यान दिलीप यांचा मृत्यू झाला. यामुळे पोपटराव आणि ज्ञानेश्वर हे आणखीनच घाबरले. त्यानंतर पोपटराव यांचा 15 जुलै रोजी तर ज्ञानेश्वर यांचा 17 जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकाच घरातील तीन भावंडांचा करोनामुळे अवघ्या नऊ दिवसांत मृत्यू झाल्याने कलापुरे कुटूंबियांवर शोककळा पसरली.
पोपटराव कलापुरे हे महापालिकेच्या नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते. ते कामगार नेते म्हणून सुपरिचित होते. तसेच त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कामगार पथसंस्थेचे अध्यक्षपदही भूषविले होते. तर ज्ञानेश्वर कलापुरे हे हिंदुस्थान ऍण्टीबोटिक्स कंपनीतून निवृत्त झाले होते. ते पैलवान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. तर तिसरे बंधू केएसबी पंप्स या कंपनीतून निवृत्त झाले होते. ते देखील पैलवान म्हणून प्रसिद्ध होते. यांच्या निधनामुळे पिंपरी चिंचवड शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. करोना बाधितांच्या संख्येने आता 11 हजारांचा टप्पाही ओलांडला आहे. यामुळे सर्वांनी घरी राहून करोनाला अटकाव करावा, असे आवाहन कलापुरे कुटूंबियांनी केले आहे.