संगमनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील कोल्हार -घोटी राज्यमार्गावर असलेल्या चिंचपूर शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीचा पाठलाग करुन आश्वी पोलिसांनी दोन दरोडेखोरांसह दोन मालवाहतूक ट्रक, एक मालवाहतूक पीकअप व घातक शस्त्रे असा सुमारे 23 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून याच दरोडेखोरांच्या टोळीतील आणखी 8 जणांना असे एकूण 10 दरोडेखोर पकडले आहे. तर दोन आरोपी फरार झाले आहेत.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास मी, पोलीस नाईक शांताराम झोडगे, आनंद वाघ, होमगार्ड अमोल सहाणे, माजी सैनिक दामोदर भोसले यांच्या समवेत गस्त घालत होतो. यावेळी लोणी – संगमनेर रस्त्यावरील चिंचपूर शिवारात असलेल्या वृंदावन हॉटेलसमोर दोन मालवाहतूक ट्रक तसेच एक पिकअप व्हॅन या तीन वाहनांमध्ये संश्ययास्पद हालचाली दिसल्याने आम्ही चौकशीसाठी तिकडे वळालो. परंतू पोलीस आपल्याकडे येत असल्याचे पाहून ट्रकमधील 8 ते 9 व पिकअप मधील दोघे अंधारात पळाले. त्यामुळे आम्ही पाठलाग करुन अरुण उर्फ बिभिषण काळे (वय – 30, रा. कन्हेरवाडी फाटा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) व समाधान शहाजी घुमरे (रा. आदोरा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) या दोघांना पकडले.
यावेळी त्याच्या वाहनाची तपासणी घेतली असता लोखंडी कटर, धारदार सुरा, लोखंडी कटावण्या, गज अशी घातक हत्यारे मिळून आली. त्यामुळे पकडलेल्या दोघांकडे पळून गेलेल्याची माहिती विचारल्यानतंर त्यानी नाना भास्कर ऊर्फ भाषा काळे, राहुल कालिदास काळे, बाबुशा भिमराज काळे, बिभिषण राजाराम काळे, रमेश लगमन काळे, सुभाष उर्फ हरी ऊर्फ दादा भास्कर काळे, चंदर उर्फ चंदऱ्या भास्कर काळे, सुधाकर श्रावण भगत, नवनाथ बाळू काळे व बाबू अनिल शिंदे सर्व कळंब तालुक्यातील (जि. उस्मानाबाद) हे रहिवासी पळाल्याचे सांगितले. त्यामुळे आम्ही लोणी व नगर नियत्रंण कक्षाला याबाबत माहिती दिली. यानतंर इतर आरोपीचा शोध घेतला असता कोल्हार (ता. राहाता) येथून नाना भास्कर ऊर्फ भाषा काळे, राहुल कालिदास काळे व बाबुशा भिमराज काळे यांना ताब्यात घेतले. यावेळी आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकणार असल्याची माहिती दिली.
दरम्यान यावेळी नगर येथील पोलीस नाईक सुनिल चव्हाण यांच्या पथकाने उर्वरित पाच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळत, त्यांना आश्वी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात या बारा आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तर दोन आरोपी फरार असल्याची माहिती दिली.