पुणे – जिल्ह्यात करोनाचा संसर्ग कमी होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. मात्र, दिवाळीनिमित्त खरेदीसाठी ठिकठिकाणी झालेली गर्दी आणि थंडीच्या दिवसांत करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाकडून खबरदारी म्हणून यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
डिसेंबर अखेरपर्यंत करोना प्रतिबंधासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे कार्यक्षम राहतील याची दक्षता घेण्याबाबतच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकरी आयुष प्रसाद यांनी आरोग्य विभागाला दिल्या.
विभागप्रमुखांच्या साप्ताहिक बैठकीमध्ये त्यांनी या सूचना दिल्या. दरम्यान, ग्रामीण भागात आतापर्यंत शुक्रवारच्या (दि.14) आकडेवारीनुसार 70 हजार 593 करोना रुग्ण आढळून आले. त्यापैकी 65 हजार 546 जणांना उपचारानंतर घरी सोडले आहे. तर सध्या 2 हजार 649 जणांवर रुग्णालयात तर 520 जणांवर घरी उपचार सुरू आहेत.
ग्रामीण भागात बाधितांचे प्रमाण मागील काही दिवसांपासून कमी झाले आहे. त्याचबरोबर सर्वेक्षणाच्या दोन टप्प्यांमध्ये पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात रुग्ण संख्या घटली आहे. तरीदेखील प्रशासनाने गाफील न राहता सतर्क राहण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
ग्रामीण भागात पुन्हा रुग्ण संख्या वाढू नये यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे डिसेंबरमध्ये रुग्णसंख्या वाढीच्या शक्यतेने दि.20 डिसेंबरदरम्यान करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व त्याअनुषंगाने कार्यान्वित यंत्रणा अधिक प्रभावीपणे कार्यक्षम राहतील याची दक्षता घ्यावी, असे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला सांगितले.