पुणे – करोनाच्या संसर्गामुळे दोन्ही पालक गमाविलेल्या 0 ते 18 वर्षे वयोगटातील अनाथ बालकांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याच्या योजनेकरीता 20 लाखांचा निधी वितरीत करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या योजनेव्यतिरिक्त राज्य शासनाकडूनही करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मदतीसाठी योजना राबविण्यात आल्या आहेत. करोनामुळे आई व वडील, असे दोन्ही पालक गमाविलेलीही बालके आढळून आलेली आहेत.
या बालकांना मदतीच्या दृष्टीकोनातून विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. या बालकांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. अनाथ बालकांसाठी अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत असून यासाठी महिला व बाल विकास आयुक्तांकडे निधी वितरीत करण्यात येणार आहे.
वितरीत निधीचा विनियोग करण्यासाठी महिला व बाल विकास आयुक्त यांना नियंत्रक तथा संनियंत्रक तसेच आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. आयुक्तांनी निधी खर्च करताना वित्त व नियोजन विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सूचना, परिपत्रके, अटी व शर्तीचे काटेकोटपणे पालन करावे लागणार आहे. निधी खर्चाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्रही शासनास सादर करावे लागणार आहे.