भारताच्या पुढाकारामध्ये पाकिस्तानकडून आडकाठी
नवी दिल्ली: जागतिक पातळीवर फैलावलेल्या करोना विषाणूच्या समस्येच्या विरोधात सामूहिक लढा देण्यासाठी भारताने “सार्क’ देशांना आवाहन केले. भारताने घेतलेल्या या पुढाकारानंतर पाकिस्तानला आपल्या राजकीय उद्दिष्टांमध्ये फारच कमी वाव मिळायला लागला आहे, असे सरकारी सूत्रांनी गुरुवारी सांगितले.
पाकिस्तानने बुधवारी सार्क देशांच्या व्यापार अधिकाऱ्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सवर बहिष्कार टाकला. भारताऐवजी गटाच्या सचिवालयाद्वारे केले गेले तरच असे उपक्रम प्रभावी ठरू शकतील, असे कारण देऊन पाकिस्तानने या कॉन्फरन्समधून अंग काढून घेतले. मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या असामान्य परिस्थितीत सामूहिकपणे काम करण्याच्या आवाहनासाठी आपण पुढाकार घेतला आहे, असे भारताने स्पष्ट केले आहे. यासाठी कोणत्याही प्रक्रियेच्या औपचारिकतेला बांधील न रहाता हा पुढाकार घेतला गेला आहे. तसेच करोना विषाणूच्या संसर्गामुळे माणसे मरत असताना, संकुचित राजकीय उद्दिष्टांना मागे ठेवण्यासाठी हा पुढाकार घेतला गेला आहे, असेही भारताने स्पष्ट केले आहे.
भारताने घेतलेल्या पुढाकारातूनच बुधवारची कॉन्फरन्स पार पडली. भारताच्या या पुढाकाराला “सार्क’च्या औपचारिक यंत्रणेखाली राबवण्याला पाकिस्तानकडून अडथळा आणला जाऊ शकतो आहे. अशा उपक्रमांमधील अजेंड्याचा मसुदा, कागदपत्रांची पूर्तता आणि अन्य प्रत्येक टप्प्यावर पाकिस्तानकडून अडथळा आणला जाऊ शकतो, असेही सूत्रांनी सांगितले.
करोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी “सार्क’नेत्यांबरोबर 15 मार्चला झालेली व्हिडीओ कॉन्फरन्स पंतप्रधान मोदींच्या पुढाकारातून झाली होती. त्यात संयुक्तपणे कार्यवाही करण्यासाठी सदस्यांचा गट करण्याची कल्पनाही मांडली गेली होती. सर्व “सार्क’ सदस्य देशांमध्ये करोनामुळे प्रतिकूल सामाजिक आणि आर्थिक परिणाम होत आहे. म्हणून “सार्क’च्या सदस्यांसाठी आणखी काही उपक्रमही भारताच्या पुढाकारातून राबवले जाण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका यांचा “सार्क’मध्ये समावेश आहे.