नवी दिल्ली, दि. 26 – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकाला प्रभाकर यांनी आज पुन्हा मोदी सरकारवर जाहीर टीका केली आहे. प्रभाकर हे स्वतःही एक अर्थतज्ज्ञ आहेत. एका ऑनलाइन चर्चेत भाग घेताना ते म्हणाले की, देशात करोनाची अत्यंत विदारक स्थिती आहे. या परिस्थितीत केंद्र सरकारने लोकांना मदत केली पाहिजे. पण ते करण्याऐवजी हे सरकार हेडलाईन मॅनेजमेंट करीत बसले असून ते स्वतःचीच पाठ थोपटत आहेत. हे सरकार सर्रास आकड्यांची लपवाछपवी करीत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, करोनाच्या स्थितीचा अर्थकारणारवरही गंभीर परिणाम होत असून सरकारला त्याचीही जाणीव नाही. लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. त्यांनी साठवून ठेवलेले पैसेही आता संपत आले आहेत. या आर्थिक नुकसानीमुळे पुन्हा उभे राहणे कठीण जात आहे. देशात करोनामुळे आतापर्यंत एक लाख 80 हजार लोक मरण पावले आहेत. प्रत्यक्षात हा आकडा याहीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.
पण सरकार खरे आकडे लपवत आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती. प्रभाकर यांनी या आधीही एका राष्ट्रीय इंग्रजी वृत्तपत्रात एक लेख लिहून मोदी सरकारच्या आर्थिक धोरण हाताळणीवरही सडकून टीका केली होती.