नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी काल राम मंदिराच्या संदर्भात जे विधान केले होते त्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने केला आहे. पित्रोदा यांची जी भूमिका आहे ती कॉंग्रेस पक्षाची भूमिका नाही असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. एएनआयशी बोलताना कॉंग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की पित्रोदांचे वक्तव्य ही कॉंग्रेसची अधिकृत भूमिका नाही. ते कॉंग्रेसच्या वतीने बोलत नसतात.
आपल्याला कोणत्याही धर्माची अडचण नाही. तुम्ही एक वेळेस जाऊन मंदिरात दर्शन घेऊ शकतात. तथापि, त्याचा प्लॅटफॉर्म तयार करणे चुकीचे आहे असे नमूद करून पित्रोदा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली होती. मोदींच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले होते की, ते केवळ एका पक्षाचे पंतप्रधान नाहीत तर सगळ्यांचे पंतप्रधान आहेत आणि देशाच्या जनतेला त्यांच्याकडून या संदेशाची अपेक्षा आहे. त्यांनी रोजगार, महागाई, तंत्रज्ञान आणि देशासमोरील आव्हाने या विषयावर बोलले पाहिजे. खरे मुद्दे कोणते आहेत हे आता लोकांनीच ठरवले पाहिजे. राम मंदिर हा खरा मुद्दा आहे की बेरोजगारी खरा मुद्दा आहे, राम मंदिर खरा मुद्दा आहे की महागाई खरा मुद्दा आहे अशी विचारणाही पित्रोदा यांनी केली.
दरम्यान पित्रोदांच्या या विधानानंतर भारतीय जनता पार्टीने त्यांना लक्ष्य केले. कॉंग्रेस पक्ष आणि पित्रोदा यांना प्रभू राम आणि हिंदूंची एवढी ॲलर्जी का आहे हे त्यांच्या विधानावरून कळते असे नमूद करत भाजपचे नेते धर्मेंद्र प्रधान म्हणाले, मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे कॉंग्रेसमध्ये नुकसान, निराशा आणि भयाची भावना निर्माण झाली आहे. पित्रोदांच्या बोलण्यातून त्यांना हिंदूंबद्दल असलेली ॲलर्जीच दिसून येते.
भाजपचे अन्य नेते सुशीलकुमार मोदी म्हणाले पित्रोदांनी ईव्हीएम आणि राम मंदिराबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचा देवावर विश्वास नसावा. भगवान राम हे आमच्या परंपरा आणि रोजगाराइतकेच महत्वाचे आहेत. सॅम पित्रोदांसारख्या लोकांना आमच्या संस्कृतीबद्दल काहीच माहिती नाही.