नवी दिल्ली – कॉंग्रेसची लोकसभेच्या 200 हून अधिक जागांवर भाजपशी थेट लढत होते. कॉंग्रेसने पुढील निवडणुकीसाठी त्या जागांवर लक्ष केंद्रित करावे. त्यामुळे संबंधित जागांपैकी निम्म्या जागा जिंकण्याची निश्चिती तो पक्ष करू शकेल, अशी भूमिका राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी सोमवारी मांडली. लोकसभेची पुढील निवडणूक 2024 मध्ये होणार आहे. त्या निवडणुकीत भाजपचा मुकाबला करण्यासाठी विरोधकांची आघाडी स्थापन व्हावी का? त्या आघाडीचा कॉंग्रेस पक्ष मुख्य स्तंभ असावा का, असे प्रश्न तेजस्वी यांना पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवेळी विचारण्यात आले.
त्यावर तेजस्वी यांनी विरोधकांच्या आघाडीला अनुकूलता दर्शवली. तसेच, कॉंग्रेसबाबतचे मत नोंदवले. कॉंग्रेसच्या पुनरूज्जीवनासाठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र, त्या घडामोडीला फारसे महत्व देण्याचे तेजस्वी यांनी टाळले. मार्केटिंग संस्था किंवा प्रोफेशनल व्यक्तींना मदतीला घेऊन निवडणुका जिंकता येत असतील तर श्रीमंत लोक राजकीय पक्ष स्थापन करतील आणि देशावर राज्य करतील, असे ते म्हणाले.
बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते असणाऱ्या तेजस्वी यांनी काही दिवसांपूर्वी ईफ्तार पार्टीचे आयोजन केले. त्यावेळी त्या राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेही उपस्थित राहिले. त्यामुळे बिहारमध्ये राजकीय फेरजुळणी होण्याचे अंदाज वर्तवले जाऊ लागले आहेत. मात्र, तशी शक्यता तेजस्वी यांनी फेटाळली. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या मित्रपक्षांशी राजदने कधीच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपाची हातमिळवणी केलेली नाही, असे त्यांनी म्हटले.