नवी दिल्ली – छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे महाअधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनामध्ये देशात होणाऱ्या आगामी निवडणुकांसह पक्ष बांधीनीकडे लक्ष दिले जाणार आहे. काँग्रेसच्या या अधिवेशनात कोणते महत्वाचे निर्णय घेतले जातात याकडे सत्ताधाऱ्यांसह सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे देखील लक्ष लागले आहे. 85 व्या महाअधिवेशनात काँग्रेसने 2024 मध्ये विरोधी ऐक्यासाठी कोणताही त्याग करण्यास तयार असल्याचे जाहीर केले आहे.
विरोधी आघाडीचे नेतृत्व करण्याच्या प्रयत्नात, काँग्रेसने तिसरी आघाडी करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या पक्षांना यावेळी लक्ष्य केले. 2024 मध्ये तिसऱ्या आघाडीच्या कोणत्याही प्रयत्नाचा थेट फायदा भाजप-एनडीएला होईल. तसेच, 85 व्या महाअधिवेशनात संमत झालेल्या राजकीय ठरावात विरोधी एकजुटीची नितांत गरज लक्षात घेऊन समविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी पक्षाने पूर्ण ताकद लावण्याची घोषणा केली आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या दिशेने एक पाऊल पुढे टाकत काँग्रेसपासून आतापर्यंत अंतर राखणाऱ्या पक्षांना मदत करण्याची घोषणा केली, विरोधी आघाडीसाठी पक्ष कोणताही त्याग करण्यास तयार असल्याचे देखील खर्गेंनी यावेळी सांगितले.
काँग्रेस अधिवेशनाचे उद्घाटन करताना खरगे म्हणाले की, 2004 ते 2014 या काळात काँग्रेसने यूपीएच्या रूपात समविचारी पक्षांचे नेतृत्व करून देशाची पूर्णपणे सेवा केली. मनमोहन सिंग यांच्या रूपाने अत्यंत प्रामाणिक पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सरकारची षड्यंत्र करून बदनामी करण्यात आली.
सध्याच्या कठीण परिस्थितीत सक्षम आणि निर्णायक नेतृत्व देऊ शकणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. विरोधी पक्षाच्या एकजुटीची आवश्यता असल्याचे देखील खर्गे यांनी यावेळी स्पष्ट केले.