नवी दिल्ली – एकीकडे पोटनिवडणुकांच्या निकालामुळे सुखावलेल्या कॉंग्रेसच्या आगामी रणधुमाळीसाठी आशा पल्लवित झाल्या आहेत. तर, दुसरीकडे ते निकाल भाजपसाठी धोक्याची सूचना देणारे ठरले आहेत.
प्रामुख्याने हिमाचल प्रदेश, राजस्थानमधील निकालांनी कॉंग्रेसच्या गोटात उत्साह संचारला आहे. उत्तरप्रदेश, पंजाबसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या निवडणुकांमध्ये पोटनिवडणुकांच्या निकालांचे प्रतिबिंब उमटेल, असे भाकीत कॉंग्रेस सुत्रांनी केले.
महागाई, इंधन दरवाढ, शेतकरी आंदोलन आदींमुळे भाजपविरोधी वातावरण तयार होत आहे. त्याचेच संकेत पोटनिवडणुकांच्या निकालाने दिल्याचे त्या सुत्रांचे म्हणणे आहे. हिमाचल प्रदेश, कर्नाटकमधील भाजप सरकारांचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचा दावाही कॉंग्रेस सुत्रांनी केला. दरम्यान, पोटनिवडणुकांचे निकाल भाजपची चिंता वाढवणारे मानले जात आहेत.
आगामी निवडणुकांसाठी सज्जता वाढवावी लागणार असल्याचा संदेश त्या पक्षाला निकालांनी दिला आहे. हिमाचलात सत्तारूढ भाजपची सपशेल पीछेहाट झाली. त्या राज्यात पुढील वर्षीच विधानसभा निवडणूक होणार आहे. अशात पोटनिवडणुकीत त्या राज्यातील लोकसभेची एक आणि विधानसभेच्या तिन्ही जागा कॉंग्रेसने जिंकल्या.