नवी दिल्ली – भारत जोडो यात्रेच्या यशामुळे कॉंग्रेसच्या गोटात उत्साह संचारला आहे. मात्र, राजकीय गतवैभव परत मिळवण्यासाठी त्या पक्षाला आणखी बरीच वाटचाल करावी लागणार आहे. ईशान्येतील तीन राज्यांत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांनी ती बाब अधोरेखित केली.
विधानसभेच्या प्रत्येकी 60 जागा असणाऱ्या त्रिपुरा, नागालॅंड आणि मेघालयमध्ये निवडणुका झाल्या. ती राज्ये तशी छोटी. पण, नववर्षातील पहिलाच रणसंग्राम असल्याने त्या निवडणुकांचे महत्व वाढले. भाजपने त्रिपुराची सत्ता राखली. तर, नागालॅंड आणि मेघालयमध्ये फारसे यश न मिळूनही भाजप इतर पक्षांच्या मदतीने सत्तेत राहील. त्यामुळे भाजपच्या दृष्टीने नववर्षाची सुरूवात चांगली झाली आहे. त्याउलट स्थिती कॉंग्रेसची आहे.
मेघालयात सर्व जागा लढवूनही कॉंग्रेसला केवळ 5 जागा जिंकता आल्या. त्रिपुरात कॉंग्रेसने डाव्या पक्षांशी हातमिळवणी केली होती. त्या राज्यात कॉंग्रेसला 3 जागांवर समाधान मानावे लागले. नागालॅंडमध्ये 23 जागा लढवलेल्या कॉंग्रेसच्या हाती भोपळा आला. संबंधित आकडेवारी कॉंग्रेसची ईशान्येतील विदारक स्थिती दर्शवते.
चालू वर्षात कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश, छत्तिसगढ, राजस्थान आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांना ताकदीने सामोरे जाण्यासाठी कॉंग्रेसला जय्यत तयारी करावी लागणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांचे निकाल कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहेत.
त्या निवडणुकांत कॉंग्रेसची कामगिरी चांगली झाल्यास त्या पक्षाचे विरोधकांच्या गोटातील वजन वाढेल. त्याचा लाभ कॉंग्रेसला वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीवेळी होईल. लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येण्याचा सूर बहुतांश विरोधी पक्ष आळवत आहेत. विरोधकांमध्ये ऐक्य घडवण्याची बरीचशी जबाबदारी कॉंग्रेसला स्वत:कडे घ्यावी लागेल. पण, विरोधकांचा प्रतिसाद विधानसभा निवडणुकांमधील कॉंग्रेसच्या कामगिरीवर अवलंबून असेल.
विधानसभा निवडणुकांचे निकाल पुढील लोकसभा निवडणुकीवर प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्ये भरीव कामगिरी करण्याच्या निर्धाराने कॉंग्रेसने रणनीती आखायला हवी अन् जोमाने लढायला हवे. भाजपसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्याशी दोन हात करण्यासाठी अजून बराच पल्ला गाठावा लागणार असल्याची खूणगाठ कॉंग्रेसने बांधायला हवी.