तळेगाव दाभाडे : संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पक्षाला “इंडिया’ आघाडीने वेड लावले आहे. संपूर्ण देशात कॉंग्रेसचा जप चालू आहे. नरेंद्र मोदी विचारतात कॉंग्रेसने काय केले, ज्या देशात अज्ञानाचा अंधकार होता, त्या देशात विज्ञानाचा दिवा लावायचा काम कॉंग्रेसने केले, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले. ते तळेगाव दाभाडे येथे आयोजित कॉंग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत बोलत होते.
यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, यशवंत मोहोळ, मिलिंद अच्युत, ऍड. खंडूजी तिकोणे, यादवेंद्र खळदे, कैलास कदम, माऊली काळोखे, ऍड. दिलीप ढमाले, चंद्रकांत सातकर, रामदास काकडे, प्रतिभा हिरे, राजेंद्र पोळ, गणेश काजळे, विशाल वाळुंज, योगेश पारगे, रणजीत काकडे, हाजीमलंग मारीमुत्तू, समीर दाभाडे, राजीव फलके, राजू शिंदे, निवृत्ती फलके आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, भारताला जगात नेण्याचे काम कॉंग्रेस पक्षांनी केले. आज जगामध्ये भारताचे जे काही अस्तित्व आहे ते कॉंग्रेसमुळेच आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांनी देशासाठी त्यागाची भूमिका घेतली. देशासाठी काम केले. त्यामुळेच आपल्या देशाची नोंद वैभवशाली इतिहासात झाली. मावळात फिरताना भीती वाटते. मावळ हा भयमुक्त झाला पाहिजे. सर्वसामान्य माणसाला जगणे मुश्किल झाले. भारतीय जनता पक्ष मराठा आंदोलन, धनगर आंदोलन अशा पद्धतीने फूट पाडायचं काम करत आहे. यांच्या नादी लागू नका.
रामदास काकडे यांनी आजपर्यंत मावळ तालुक्यामध्ये कॉंग्रेस पक्षाचे मतदान व यामुळे विधानसभेवर निवडून जाणारे आमदार यांचे गणित मांडले व आगामी काळात कॉंग्रेस पक्षाची मावळ तालुक्यातील दावेदारी सांगितली. सूत्रसंचालन रोहिदास वाळुंज यांनी केले. राजेश वाघोले यांनी आभार मानले.