लखनौ – उत्तरप्रदेशात लखीमपुर येथे शेतकऱ्यांना चिरडण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ कॉंग्रेसने त्या विधानसभेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे.
आज कॉंगेसच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या समोर जमून राज्य सरकारच्या विरोधात उग्र निदर्शनेही केली. राज्यातील लखीमपुरच्या घटनेवरून लोकांचे लक्ष अन्यत्र वेधण्यासाठीच राज्य सरकारने ही निवडणूक जाहीर केली आहे असा आरोपहीं कॉंग्रेसने केला आहे.
उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजप आणि समाजवादी पक्षाची हातमिळवणी झाली आहे त्यांच्यात सध्या मैत्रीपुर्ण लढत होताना दिसत आहे असा आरोपही कॉंग्रेस पक्षाने केला आहे. लखीमपुरच्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी भाजप बरोबरच समाजवादी पक्षाचीही इच्छा दिसत नाही असा आरोपही कॉंग्रेसने केला.
प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अजकुमार लल्लू यांनी म्हटले आहे की, सध्या उत्तरप्रदेशात भाजप आणि समाजवादी पक्षामध्ये नुरा कुस्ती सुरू आहे. अजय मिश्रांचा राजीनामा घेईपर्यंत आम्ही भाजप सरकारच्या विरोधात लढणार आहोत असेही लल्लू यांनी स्पष्ट केले आहे.