पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील शवविच्छेदन गृहातून दोन महिलांच्या मृतदेहांची अदला-बदली झाल्याने बुधवारी (दि. 19) मोठा गोंधळ झाला. एका कुटुंबाने दुसऱ्याच महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन त्यावर अंत्यसंस्कारही केले. त्या महिलेचा मृतदेह घेण्यासाठी रुग्णालयात आलेल्या नातेवाइकांनी रुग्णालयात तोडफोड केली.
स्नेहलता अशोक गायकवाड (वय 57, रा. दापोडी) यांच्या अंगावर मंगळवारी (दि. 18) दुपारी तीन वाजताच्या सुमारास भिंत कोसळली. एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी स्नेहलता गायकवाड यांचा मृतदेह पिंपरी येथील वायसीएम शवविच्छेदनगृहात पाठविण्यात आला. स्नेहलता यांचे नातेवाईक गुजरात येथून येणार असल्याने शवविच्छेदनानंतर रात्री त्यांचा मृतदेह वायसीएम मध्येच ठेवण्यात आला.
बुधवारी सकाळी सात वाजता त्यांचा मुलगा रोहन गायकवाड याने येऊन पाहिले आणि स्मशान दाखला मिळविण्यासाठीची कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केली. सकाळी अकरा वाजता मृतदेह रुग्णवाहिकेतून नेत असताना पाहिले असता तो स्नेहलता यांचा नसल्याचे उघड झाले. त्यानंतर नातेवाइकांनी रुग्णालय प्रशासनाला विचारणा केली. दरम्यान, मंगळवारी मीना बाळू गाडे (वय 60, रा. थेरगाव) यांचा दुर्धर आजाराने मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह देखील वायसीएम मधील शवविच्छेदनगृहात आणला होता. मीना यांच्या नातेवाइकांनी स्नेहलता यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि घाईने त्यांच्यावर थेरगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. मृतदेह ताब्यात घेल्यानंतर तो आपल्या आईचा नसल्याचा संशय मीना यांच्या मुलाने व्यक्त केला होता. मात्र शवविच्छेदन केल्याने तो तसा दिसत असल्याचे उत्तर त्यांना मिळाले.
एकाच मृतदेहावर दोन कुटुंबाकडून अंत्यसंस्कार
मीना गाडे यांच्या नातेवाईकांनी स्नेहलता यांचा मृतदेह ताब्यात घेतला. मीना यांचा दुर्धर आजाराने मृत्यू झाला असल्याने त्यांचा मृतदेह जास्त वेळ न ठेवता त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्नेहलता यांच्या कुटुंबीयांनी बुधवारी दुपारी थेरगाव येथील स्मशानभूमीत जाऊन पुन्हा एकदा अंत्यसंस्कार केले.
भावाला बहिणीचे अंत्यदर्शन मिळाले नाही
स्नेहलता यांचा अपघात झाल्याचे समजताच त्यांचे भाऊ गुजरात येथून निघाले. त्यांना पुण्यात पोहोचण्यासाठी उशीर झाला. तोपर्यंत गाडे यांच्या नातेवाईकांनी स्नेहलता गायकवाड यांच्यावर अंत्यसंस्कार देखील केले होते. त्यामुळे स्नेहलता यांच्या भाऊ आणि काही नातेवाईकांना त्यांचे अंत्यदर्शन देखील घेता आले नाही.
मृतदेह ताब्यात देण्याची जबाबदारी पोलिसांची
वायसीएम येथील शवविच्छेदनगृहात मृतदेह आणण्याची तिथून तो मृतदेह शवविच्छेदनासाठी डॉक्टरांकडे देण्याची आणि शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची जबाबदारी पोलिसांची असते. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांकडे मनुष्यबळ कमी असल्याने तसेच पोलीस वेळेवर उपलब्ध नसल्याने शवविच्छेदन गृहातील कर्मचारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचे काम करतात, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
तुमचा मृतदेह मिळवून देतो
स्नेहलता गायकवाड आणि मीना गाडे यांचा मृतदेह अदलाबदल झाल्याचे उघड झाल्यानंतर स्नेहलता यांचे नातेवाईक अधिष्ठाता राजेश वाबळे यांच्याकडे गेले. वाबळे यांना विचारणा केली असता त्यांनी स्नेहलता यांचा मृतदेह दुपारी दीड वाजेपर्यंत मिळवून देतो, असे आश्वासन नातेवाईकांना दिले. मात्र त्यापूर्वीच स्नेहलता यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्याचे समोर येताच नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली.
मग चूक कोणाची
मृतदेहाची ओळख पटवून तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला जातो. मृतदेह ताब्यात मिळाल्याबाबत नातेवाईकांची सही घेतली जाते. बुधवारी घडलेल्या प्रकरणात दोन्ही महिलांच्या नातेवाइकांनी ओळख पटवून मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर वास्तव उघड झाले आहे. दोन्ही महिलांच्या मृतदेहाला लावलेले टॅग देखील त्याच महिलांच्या नावाचे आहेत. पण भावनेच्या भारत नातेवाइकांनी त्याकडे लक्ष दिले नाही. एका महिलेच्या नातेवाइकांनी अंत्यसंस्कार केले तरी त्यांच्या ही बाब लक्षात आली नाही. तर दुसऱ्या महिलेचा मृतदेह घेऊन बाहेर पडत असताना चुकीचा मृतदेह असल्याचे उघड झाले. शवविच्छेदन गृहातील कामगारांना नातेवाइकांची माहिती नसते. ते ओळखपत्र बघून मृतदेह ताब्यात देतात. त्यामुळे प्रश्न असता उरतो की, चूक नेमकी कोणाची. मृतदेह ताब्यात देणाऱ्याची की घेणाऱ्याची.