पुणे – इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक बदलत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये पुरेशी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
राज्य मंडळाकडून 21 ऑगस्ट रोजी अकरावीसाठी “सीईटी’ घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ऐच्छिक आहे. मात्र, “सीईटी’च्या गुणवत्तेनुसारच आधी प्रवेशासाठी प्राधान्य आहे. त्यानंतर रिक्त जागांवर अंतर्गत मूल्यमापनाच्या निकालाद्वारे प्रवेश देण्यात येणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडून अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश पद्धत राबविण्याची पूर्वतयारी करण्यात आली आहे.
प्रवेशाची कार्यपद्धतीही निश्चित झाली आहे. मात्र, अद्याप बहुसंख्य विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम आहे. या प्रक्रियेबाबत पूरेशी जागृती झालेली नाही. विद्यार्थी, पालक, संबंधित कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक शाळा, मार्गदर्शन केंद्र यांच्यासाठी आवश्यक प्रशिक्षण वर्गांचे आयोजनच करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी अडथळे निर्माण होऊ शकतात. हे टाळण्यासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी व अर्ज भरण्याची सुविधा सुरू करण्यास मुदतवाढ दिली आहे. आता ही अर्ज प्रक्रिया 16 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी 1 ऑगस्टपासून सुरू झाली असून त्यालाही मुदतावाढ दिली आहे.
अर्ज भरण्याच्या सरावासाठी संकेतस्थळावर सुविधाही उपलब्ध आहे. 13 ऑगस्टपर्यंत ती सुरू राहणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली आहे.