पिंपरी – गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक दुचाकींनी पेट घेतल्याच्या एक-दोन घटनांच्या क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यामुळे सर्वसामान्यांमध्ये ई-वाहनांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु भारतीय कंपन्यांच्या वाहनांवर नागरिकांकडून विश्वास दाखविला जात आहे.
ई-वाहन खरेदीसाठी केंद्र आणि राज्य शासन मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहे. ई-वाहने पेट घेण्याच्या घटनांमुळे केंद्र शासनाने ई-वाहन निर्मितीवर निर्बंध घातले आहेत. तशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील ई-वाहन खरेदी केलेल्या वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नागरिकांनी शोरूममध्ये फोन करून विविध प्रश्नांची सरबत्ती सुरू केली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर ई-वाहनांची विक्री सुरू आहे. केंद्र आणि राज्य शासनाने ग्राहकांना ई-वाहन खरेदी करण्यासाठी सबसिडी देत आहे. तसेच इंधन दरवाढीमुळे नागरिक ई-वाहन खरेदीकडे वळले आहेत. त्यामुळे सध्या ई-वाहन खरेदीसाठी गेल्यानंतर प्रथम गाडी बुक करावी लागत आहे. आता बुक केलेली गाडी पुढील पाच ते सहा महिन्यांनी मिळत आहे. एवढी मागणी इलेक्ट्रिक वाहनांना आहे. वेटिंग असून देखील नागरिकांचा बुकींग करण्याकडे कल वाढला होता.
परंतु मागील काही दिवसांमध्ये देशभरात ई-वाहन पेट घेऊन अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शासनाने ई-वाहन कंपन्यांना नवीन गाड्या बनविण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे देशपातळीवर ई वाहन खरेदी केलेल्या आणि बुकींग केलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर काही ग्राहक शोरूममध्ये येऊन बुकींग केलेली गाडी रद्द करण्यासाठी काय करावे लागेल याबाबत माहिती घेत आहेत.
शहरातील ई-वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आपण घेतलेली गाडी सुरक्षित आहे की आपणास देखील अपघात होऊ शकतो, अशी भावना मनात येत आहे. बहुतांश वाहनधारकांनी शोरूममध्ये फोन करून आपल्या कंपनीविषयी शासनाकडून काही जीआर आला आहे का? आमच्या गाड्या पुन्हा शोरूममध्ये जमा कराव्या लागणार आहेत का? असे विविध प्रश्न ग्राहक शोरूममध्ये फोन करून विचारत आहेत.
सोशल मीडियावर अफवांचे पीक
मागील काही दिवसांपासून बातम्यांमधून ई-वाहनांबाबत वृत्त येत आहे. तसेच सोशल मीडियावर ई-वाहनांबाबत अफवांचे पीक आले आहे. पेटलेल्या एक दोन वाहनांच्या क्लिप्स अशा पद्धतीने व्हायरल केल्या जात आहेत जणू काही सर्वच गाड्या धोकादायक आहेत. त्यामुळे ज्यांनी इलेक्ट्रिक दुचाकी विकत घेतल्या आहेत त्यांनाही नातेवाईक फोन करून गाडी न वापरण्याचा सल्ला देत आहेत.
बाजारात विक्रीसाठी असलेल्या सर्वच कंपन्यांच्या गाड्यांना ही अडचण आलेली नाही. परंतु ग्राहकांच्या मनात भीतीचे वातावरण असल्याने कालपासून मोठ्या प्रमाणावर फोन करून ग्राहक माहिती घेत आहेत. तसेच ज्यांनी गाड्या बुकींग केल्या आहेत ते ग्राहक बुकींग रद्द करता येईल का अशी माहिती घेत आहेत.
– ई-वाहन विक्रेते, पिंपरी-चिंचवड.