सातारा -साथरोग प्रतिबंधात्माक कायदा 1897 मधील अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ग्रामीण व शहरी भागात बांधकामे सुरू ठेवण्यासाठी काही अटी व शर्तींवर परवानगी दिली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी क्षेत्रामधील वेळोवेळी निश्चित केलेले बाधित क्षेत्र वगळून सुरू असलेल्या बांधकामास काम सुरू करण्यासाठी अर्जदारांनी संबंधित प्राधिकाऱ्यांकडे रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. नगरपालिका, शहरी क्षेत्रामध्ये पूर्वीपासून सुरू असलेली बांधकामे पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी परवानगी राहील. या बांधकाम कामावरील कामगार त्याठिकाणी वास्तव्यास असणे बंधनकारक असेल. क्षेत्राबाहेरील कोणताही कामगार आणता येणार नाही.
याबाबत संबंधित नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी अहवाल संबंधित प्रांताधिकाऱ्यांच्याकडे सादर करावा. त्यावर प्रांताधिकाऱ्यांनी परवानगी देण्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा. ग्रामीण भागामधील चालू असलेली बांधकामे चालू करण्यासाठीच्या परवानगीसाठी अर्जदारांच्या अर्जावरुन परवानगी देण्यात यावी.प्रांताधिकाऱ्यांनी फक्त करोना कालावधीसाठी सुरू असलेल्या बांधकाम करण्यासाठीच परवानगी द्यावयाची आहे. बांधकामाच्या परवानगीबाबत अर्जदाराकडून 100 रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर शपथपत्र घ्यावे व विनाविलंब सुरू असलेल्या बांधकामास परवानगी द्यावी.
ज्या नगरपालिका शहरी क्षेत्रामध्ये सद्यस्थितीत बांधकामे चालू आहे, अशा ठिकाणावरील कामगार कामाच्या आवारातून बाहेर जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच संबंधित ठेकेदार यांनी कामगारांच्या खाण्या-पिण्याची सोय कामाच्या आवारातच करणे आवश्यक आहे. ठेकेदारांनी बांधकामाचे ठिकाण 5 किंवा 5 पेक्षा जादा कामगारांची गर्दी होणार नाही. तसेच 5 पेक्षा जादा कामगारांची गर्दी होईल, असे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येणार नाही, याची दक्षता घ्यावी. परवानगी जिल्ह्यात रहिवास असलेल्या कामगारांच्यासाठीच असून नव्याने परजिल्ह्यातील कामगार कामावर येणार नाहीत, याची सर्वस्वी जबाबदारी ठेकेदारांची राहील. कामाच्या ठिकाणी आवश्यक मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग तसेच सुरक्षिततेचे सर्व नियम पाळणे बंधनकारक राहणार आहे.