राजगुरुनगर (प्रतिनिधी)- शहरातील वाडा रस्त्या काँक्रिटचा झाला आहे; मात्र रस्त्याच्या कडेला भराव न केल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक वाहने रस्त्यावर पार्किंग केली जात असल्याने विद्यार्थी, नागरिक व पादचारी यांना खूप अडचण होत आहे.
शहराची लोकसंख्या दीड लाखांच्या वर आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. अशा वर्दळीचा रस्ता म्हणजे वाडा रोड आहे. भीमाशंकर-भोरगिरीकडे जाणारा सर्वाधिक वाहतुकीचा रस्ता आहे. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त असलेल्या या शिरूर- राजगुरुनगर -वाडा मार्गे भीमाशंकर असा हा रस्ता आहे. भाविक भक्तांची वाहने याच रस्त्याने भीमाशंकरकडे जातात आणि येतात.
संगम गार्डन ते महात्मा गांधी विद्यालयापर्यंत या रस्त्याचे दीड महिन्यापूर्वी रस्ता रुंदीकरण व काँक्रीटीकरण झाले आहे. या रस्त्यावर खोदकाम न करता आहे त्या रस्त्यावर सुमारे दीड ते दोन फूट उंच काँक्रीटीकरण करण्यात आले आहे त्यामुळे रस्त्या उंच होउन रस्त्याच्या दोन्ही बाजू खाली गेल्या आहेत. रस्त्याच्या बाजूला खोल खड्डे झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून जाणे येणे जिकिरीचे झाले आहे.
सार्वजनिक बांधकाम आणि संबंधित ठेकेदार यांच्या दुर्लक्षामुळे आणि बेपर्वाईमुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. रस्ता करताना गटारे बुजवली नाहीत त्यामुळे त्यात पडण्याची भीती जास्त आहे.
काँक्रीटचा रस्ता झाल्याने आणि त्याच्या दोन्ही बाजूकडून रस्ता खडी, माती मुरुमाने उचलून न घेतल्याने सुमारे दोन फूट उंच रस्त्यावरच वाहने पार्किंग केली जात आहेत. दोन्ही बाजूकडून रस्ता खोलगट असल्याने व काहीसा मुरूम टाकल्याने त्यावरून घसरून पडण्याचे प्रकार झाल्याने नागरीक रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन चालत आहेत. वाहने रस्त्यात उभी केल्याने अरुंद रस्ता झाला आहे. त्याचा त्रास इतर वाहने चालवणार्या चालकांना आणि स्थानिक पादचारी याना होत आहे.
अतिक्रमणे वाढली
राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यावर संगम गार्डन ते महात्मा गांधी (तिन्हेवाडी चौक) पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण झाल्यानंतर पथारीधारक, टपर्यावाल्यांनी अतिक्रमण केले आहे. काँक्रिटचा रस्ता सोडून उरलेल्या जागेत टपर्या टाकल्याने पादचारी शाळकरी विद्यार्थ्यांना जाण्या-येण्यासाठी त्रासदायक होत आहे. नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष असल्याने रस्त्यावरील अतिक्रमणाच्या दिवसागणिक वाढ होत आहे. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे.