मुंबई – आज गिरगाव चौपाटी येथे सागराच्या साक्षीने सुंदर महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल टाकण्यात आले. “सुंदर महाराष्ट्र, सुंदर भारत’ घडविण्यासाठी आपण टाकलेले हे मोठे पाऊल असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आज स्वच्छतेची ही लोकचळवळ झाली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
राज्यात शहरी आणि ग्रामीण मिळून 72 हजारांपेक्षा जास्त ठिकाणी स्वच्छतेची ही मोहीम पार पडली.स्वच्छतेसाठी “एक तारीख, एक तास’ या राज्यस्तरीय मोहिमेची सुरुवात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. तसेच उद्या महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर नागरिकांच्या श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वच्छता हीच सेवा’ हे अभियान महत्त्वाचे आहे. ते कागदावर ठेवू नका. प्रत्यक्ष फिल्डवर काम दिसले पाहिजे. आजचा दिवस झाला की संपले, असे नाही. “आज स्वच्छता आणि उद्या कचरा’ असे होता कामा नये, असेही ते म्हणाले. स्वच्छतेत महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देऊया, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
राज्यातील गडकिल्ले, धार्मिक स्थळे, मंदिरे यांच्या परिसरातदेखील स्वच्छता असली पाहिजे. ही तीर्थक्षेत्रे सुंदर दिसली पाहिजेत यासाठीदेखील सर्वांनी सहभागी होऊन काम केले पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगात भारताचा डंका वाजत आहे. जे पन्नास-साठ वर्षांत जमले नाही ते मोदींनी गेल्या आठ-नऊ वर्षांत केले, असेही ते म्हणाले.