जळोची -बारामती लोकसभा मतदारसंघातील बहुतांश भागात रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या सर्व शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना याबाबत सूचना केली असून तसे लेखी पत्रही पाठवले आहे.
बारामतीसह इंदापूर, दौंड, पुरंदर आणि खडकवासला मतदारसंघाच्या ग्रामीण भागात रविवारी (दि. 6) वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. पावसामुळे शेकडो एकर शेतीतील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दैनंदिन बाजारात जाणाऱ्या भाज्या, फुले, फळे आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आस्मानी संकटाने हिरावून नेला आहे.
एकीकडे करोनाचे संकट असताना पावसाने नुकसानीत आणखी भर टाकली आहे. सर्व भागातील नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.