भाष्य (सुनील राऊत) – गेल्या काही वर्षांत संक्रांतीत उडविल्या जाणाऱ्या पतंगासाठी वापरला जाणारा चिनी मांजा सर्वसामान्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर घरी परतताना कधी या दोऱ्याने गळा कापला जाईल, याची धास्ती घेऊनच हजारो पुणेकर संक्रांतीच्या दिवशी घराबाहेर पडत आहेत. त्यापेक्षाही वाईट बाब म्हणजे, या मांजावर उच्च न्यायालयाने बंदी घातली असतानाही महानगरांमध्ये राजरोसपणे या मांजाची विक्री सुरू आहे.
जवळपास प्रत्येक मोठ्या शहरांत दरवर्षी या मांजाने गळा चिरण्याच्या घटना वाढतच आहेत. त्यामुळे आरोपीच्या केसावरून गुन्हेगारांचा माग काढणारे पोलीस प्रशासन आणि जिल्ह्यात कशाला बंदी घालायची आणि कशाला नाही, याचे अधिकार असलेल्या जिल्हा प्रशासनाला मात्र राजरोसपणे विक्री सुरू असलेल्या आणि पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या या मांजाचे विक्रेते आणि उत्पादक सापडत कसे नाहीत, असा साधा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. त्यामुळे न्यायालयाचा आदेश असतानाही या मांजामुळे जखमी झालेल्या नागरिकांच्या तसेच मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या मृत्युप्रकरणी या निष्क्रीय यंत्रणेच्या प्रशासन प्रमुखांवरच थेट मनुष्यवधाचे गुन्हे दाखल का करू नयेत, असे प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. पुण्यात यावर्षी सातारा रस्त्यावर एका पोलीस शिपायाचा, तर नेहरू रस्त्यावरील उड्डाण पुलावर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे गळे या मांजाने कापले गेले. सुदैवाने त्यांचा जीव वाचला असला तरी त्यांना गळ्याला झालेल्या जखमा गंभीर आहेत.
पूल ठरताहेत जीवघेणे
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शहरात चिनी मांजाची दहशत आहे. प्रामुख्याने चिनी मांजामुळे जीव जाण्याचे तसेच गळा चिरण्याचे अपघात शहरातील उड्डाण पुलांवरच होत असल्याचे आतापर्यंत झालेल्या घटनांमधून समोर आले आहे. उड्डाण पुलाच्या सुरक्षाभिंती सुमारे तीन ते चार फूट उंच असतात. त्यामुळे चिनी मांजा पंतगासह उड्डाण पुलाला अडकल्यानंतर पतंग उडविणारा एका बाजूने हा मांजा जोर लावून ओढत असतो. अशा स्थितीत हवेत सुमारे तीन ते चार फुटांवर अडकलेला हा मांजा एखाद्या सुऱ्याप्रमाणे एखादी दुचाकी वेगात आली की त्यावर बसलेल्या व्यक्तीच्या गळ्याला अडकून गळाच चिरतो. पुण्यात आतापर्यंत छत्रपती शिवाजी पूल, दांडेकर पूल, शंकर महाराज पूल, संगमवाडी पूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाण पूल या पुलांवर मांजा कापण्यामुळे प्राणांतिक तसेच गळा कापण्याच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय शहरातील अनेक झाडांवर या मांजाच्या जाळ्या असून, या वर्षात आतापर्यंत जवळपास 50 हून अधिक पक्ष्यांची सुटका अग्निशमन दलाने केली आहे. त्यामुळे माणसांसह पक्ष्यांसाठीही हा मांजा जीवणेघा ठरत आहे.
पोलिसांचा धाक नावालाच
शहरात दिवसाढवळ्या मांजाची विक्री सुरू असताना तो शहरात कोण आणते, गुपचूप कोण विकते, त्याचे उत्पादन कुठे केले जाते, तो शहरात कसा आणला जातो, याचा माग काढू शकत नाही का, असा साधा प्रश्न आहे. हा मांजा घेऊन पंतग उडविणाऱ्या मुलांकडे पोलिसांनी चौकशी केली तरी सहज मांजा विक्री करणारे सापडतील. मात्र, एवढा साधा तपास करणे पोलिसांच्या प्रतिमेला शोभत नाही, असा समज झालेली यंत्रणा कारवाई करण्यासाठी काहीच का हालचाल करत नाही की पोलिसांचा धाक केवळ नावालाच आहे, अशी स्थिती शहरात निर्माण झाली आहे.