ठाणे – देशात एकीकडे करोना संसर्ग थैमान घालत आहे. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. या स्थितीतही वैद्यकीय यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करून रुग्णांना बर करत आहेत. त्यातच म्युकर मायकोसिस या आजाराने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे राज्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. करोनामुक्त झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस या नवीन बुरशीजन्य आजाराची अधिक भीती आहे. आता या आजारासंदर्भात दिलासादायक वृत्त आलं आहे.
ठाण्यात म्युकर मायकोसिसच्या पाच रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. त्यामुळे म्युकर मायकोसिसचे लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता उपचार करून घ्यावेत, असं आवाहन ठाणे पालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केलं आहे. तसेच वेळेत योग्य उपचार घेतल्यास म्युकर मायकोसिस पूर्ण बरा करू शकतो.
ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाने सुरुवातील ५ रुग्णांवर उपचार सुरु केले. करोनाच्या पहिल्या लाटेत जून ते ऑगस्ट महिन्यात 2 रुग्णांवर तर दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत 3 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. योग्य उपचारांनंतर सर्व रुग्ण सुखरूप घरी परतले आहेत.
मेडिसीन विभागाचे डॉ. योगेश शर्मा, डॉ. सुमन राठोड, शस्त्रक्रिया विभागाच्या डॉ. श्वेता बाविस्कर आणि डॉ. अमोल खळे या तज्ज्ञ डॉक्टर्सच्या टीमने या यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत.