सातारा – राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झालेल्या अंतर्गत बंडाळीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यात पुन्हा नव्या जोमाने पक्ष बांधणीची प्रक्रिया सुरु केली आहे. राज्यातील नऊ आमदारांकडे काही जिल्ह्यांचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे साताऱ्यासह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करुन समर्थकांसह सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याने सध्या राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत आपण भाजपबरोबर जाणार नाही, अशी भूमिका घेत पक्ष बांधणीसाठी राज्यभर दौरे सुरु केले आहेत. तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीकडे लक्ष केंद्रित केले आहे. सातारा जिल्ह्याचे प्रभारी म्हणून आ. बाळासाहेब पाटील यांच्याकडे जबाबदारी असून साताऱ्यासह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचीही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
आ. अनिल देशमुख यांच्याकडे अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, आ. एकनाथ खडसे यांच्याकडे जळगाव, धुळे, नंदूरबार, बुलढाणा, आ. राजेश टोपे यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, लातूर, धाराशिव, आ.जितेंद्र आव्हाड यांच्याकडे ठाणे, बीड, आ. प्राजक्त तनपुरे यांच्याकडे नाशिक, अहमदनगर, आ. अशोक पवार यांच्याकडे पुणे जिल्हा, आ. रोहित पवार यांच्याकडे रायगड, भंडारा, गोंदिया, आ. सुनील भुसारा यांच्याकडे पालघर, हिंगोली, नांदेड, गडचिरोली जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.