नवी दिल्ली – कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरामध्ये २१ दिवसांचा लॉक डाऊन लागू केला होता. या देशव्यापी लॉक डाऊनची मुदत येत्या १४ तारखेला पूर्ण होत आहे. देशातील कोरोना प्रादुर्भावाची सद्य परिस्थिती पाहता केंद्र व राज्य सरकारने लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रातर्फे अद्याप याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी महाराष्ट्रासह इतर काही राज्यांनी लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय जाहीर केलाय. मात्र हा वाढविण्यात आलेला लॉक डाऊन सध्या लागू असलेल्या लॉक डाऊनपेक्षा काही प्रमाणात वेलंगला असणार असल्याची माहिती मिळत आहे.
१४ एप्रिलनंतर लागू करण्यात येणाऱ्या या लॉक डाऊनबाबत काही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली असून यानुसार केंद्र सरकार देशाची वर्गवारी तीन रंगांमध्ये करणार आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येनुसार देशातील विविध भागांना हिरवा, केशरी व लाल रंगाने दर्शवले जाणार असून रंगानुसार त्या-त्या भागातील लॉक डाऊनचे नियम ठरणार आहेत.
ग्रीन झोन
रंगानुसार वर्गवारी करण्याच्या संभाव्य निर्णयाबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार कोरोनाचा एकही रुग्ण नसलेल्या जिल्ह्यांची वर्गवारी हिरव्या रंगामध्ये होणार असून या जिल्ह्यांना ‘ग्रीन झोन’ असं संबोधलं जाईल. देशामध्ये एकूण ४०० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नसल्याने या जिल्ह्यांना ग्रीन झोनचा दर्जा प्राप्त होणार आहे.
ऑरेंज झोन
ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे १५ पेक्षा कमी रुग्ण आहेत व कोरोनाग्रतांच्या संख्येत वाढ झाली नाही अशा जिल्ह्यांना केशरी रंग देण्यात येणार असून त्यांना ऑरेंज झोन संबोधलं जाईल. ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक वाहतूक, शेती विषयक कामे करण्यास अंशतः मान्यता देण्यात येईल.
रेड झोन
देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये १५ किंवा त्यापेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत त्या जिल्ह्यांना लाल रंग देण्यात येणार असून त्यांना रेड झोन असं संबोधलं जाईल. अशा भागांमध्ये लॉक डाऊनच्या नियमांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही.