अरुण गोखले
सर श्रावणाची सांगे गोड गुपित कानात ।
झुला फांदीवरचा गं श्रावणाचे गातो गीत ।।
असे म्हणत सभोवतीचा निसर्गांनी फुललेला, बहरलेला, आनंद आणि उत्साह ओसंडून वाहणारा श्रावण हा व्रत वैकल्ये करताना कधी मध्यापर्यंत येऊन पोहचतो, ते कळतच नाही. श्रावण पौर्णिमा ही नारळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते.
या दिवशी कोळी समाज सागरी संपत्तीवर त्याचा जीवनचरितार्थ चालतो त्या सागरराजाला मोठ्या कृतज्ञतेने नारळ अर्पण करून, त्याची भक्तिभावाने पूजा करतो. “हे सागरराज! उद्यापासून पुन्हा तुझ्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या आम्हा लेकरांचा तू वादळ, वारे, तुफान यापासून रक्षण कर. तुझ्या कृपेने आम्हाला भरपूर सागरी संपत्तीचा लाभ होऊ दे. आम्हास सुख, सौख्य देणाऱ्या हे सागर देवा! आमची ही पूजा मान्य करून घे.
तुझा कृपाशीर्वाद आम्हाला सदैव लाभू दे’, अशी प्रार्थना करून पुन्हा आपले काम दुसऱ्या दिवसापासून नव्या जोमाने सुरू करतो. “नारळी पुनव’ हा सागरी किनाऱ्याच्या कोळी लोकांचा एक खास आनंद उत्साहाने साजरा करावयाचा दिवस. दर्या पुन्हा या आपल्या लाडक्या लेकरांना खुणावू लागतो.
या नारळी पौर्णिमेच्या निमित्याने घरोघरी केला जाणारा नारळी भात, ओला नारळ वापरून तयार केले जाणारे अनेक खाद्यपदार्थ हे या दिवसातील वातावरणात आरोग्यास अत्यंत पोषक ठरणारे असतात. नारळाची स्निग्धता, गोडी, पौष्टिकता ही मानवी शरीरास फार आवश्यक असते, असे आरोग्यशास्त्रही सांगते.
या दिवसाचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे रक्षाबंधन. श्रावणातल्या पौर्णिमेला वेगवेगळ्या भागात वेगवेगळे विधी केले जातात. काही भागात हा दिवस श्रीवरुण देवाच्या म्हणजेच पर्जन्य देवतेच्या पूजेचा दिवस म्हणून त्याचीही कृतज्ञपूजा करून साजरा केला जातो. नारळी पौर्णिमा हा केवळ कोळी लोकांचा उत्सव नसून सर्व भारतीय हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी खास कोळी बांधवांची भूमी असल्याने येथे हा सण मोठ्या श्रद्धेने दरवर्षी साजरा केला जातो.