नवी दिल्ली – भारतीय फुटबॉलचा स्तर गेल्या काही वर्षांपासून निश्चितच सुधारला आहे. मात्र, या खेळात यशस्वी होण्यासाठी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू काय नियोजन करत आहेत हे समजण्यासाठी सिक्थ सेन्सची गरज असते, असे मत भारताचा सर्वांत यशस्वी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू बायचुंग भूतिया याने व्यक्त केले आहे.
या खेळाचा प्रसार आता देशभरात होत आहे. येत्या काळात सुपरलीग स्पर्धांची व्याप्तीही वाढविण्याची गरज आहे. हा खेळ परदेशी संघातील खेळाडूंप्रमाणे अत्यंत वेगवान पद्धतीने खेळण्याचा भारतीय खेळाडूंना सराव मिळाला पाहिजे. अर्थात पुढील काळात होत असलेल्या स्पर्धांमध्ये यश मिळवायचे असेल तर त्यासाठी खेळाडूंना आपले कमकुवत दुवे दुरूस्त करावे लागतील. सातत्याने बलाढ्य संघांशी खेळणे हा देखील एक चांगला सराव ठरू शकतो. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग घेणे आवश्यक असते, असेही तो म्हणाला.
फुटबॉलच्या खेळात अनेक वर्षे व्यतीत केली तरीही खेळाडू यशस्वी होत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे ते आपल्या सिक्थ सेन्समध्ये सुधारणा करण्यासाठी मेहनत घेत नाहीत. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंच्या खेळाचा अभ्यास करणे त्यासाठी खूप महत्त्वाचे असते. भारतीय फुटबॉलला जगात आपली ओळख निर्माण करायची असेल तर सातत्याने सामने खेळणे व सातत्याने गोल करणे जितके महत्त्वाचे आहे तितकीच आपली तंदुरुस्ती टिकवून ठेवणेही आवश्यक असते, असेही भूतिया म्हणाला.
देशात फुटबॉलचा प्रसार अद्याप अपेक्षेइतका झालेला नाही. याची व्याप्ती वाढवायची असेल तर शालेय आणि क्लब फुटबॉलला प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. या स्तरावर खेळत असलेल्या खेळाडूंना जास्तीत जास्त सामने खेळण्याची संधी दिली गेली पाहिजे. केवळ सराव शिबिरात सराव करून खेळाडूंना अनुभव मिळणार नाही. सामने खेळले तरच दडपण कसे हाताळायचे, प्रतिस्पर्धी संघ आघाडीवर असेल तर आक्रमक खेळ कसा करायचा तसेच बचाव करताना नियोजन कसे करायचे याचे धडे पुस्तकातून मिळत नाहीत तर प्रत्यक्ष सामन्यांतून मिळतात, असेही भूतियाने सांगितले.
राजाश्रय मिळावा
भारतात क्रिकेट, टेनिस, हॉकी व बॅडमिंटन लोकप्रिय झाले कारण या खेळांना लोकाश्रयाबरोबरच राजाश्रयही मिळाला. आता याच धर्तीवर फुटबॉललाही राजाश्रय मिळाला तरच त्यात प्रगती होईल व नवी गुणवत्ता सातत्याने समोर येईल, असे मतही भूतियाने व्यक्त केले.