सिंधुदुर्ग – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री आणि नेते तसेच भाजप नेतेही उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोकणची लोकं हुशार आहेत. ते डोळे मिटून शांत राहत नाहीत. म्हणूनच त्यांनी विनायक राऊतांना निवडून दिलं आणि मला त्यांचा अभिमान आहे. बाळासाहेबांनी खोटं बोलणारांना शिवसेनेतून हाकलून लावलं, अशा शब्दात नारायण राणेंवर टीका केली.
आजचा दिवस माझ्यासाठी सौभाग्याचा –
आजचा क्षण हा आदळाआपट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. माझ्यासाठी हा सौभाग्याचा दिवस आहे. कुणी काय केलं आणि कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोकणाची संपत्ती आपल्याला जगासमोर न्यायची आहे. कोकणचं कॅलिफोर्निया करु असं अनेकजण म्हणायचे. बाळासाहेब म्हणाले होते, कोकणला कॅलिफोर्नियापेक्षा भारी बनवा. कोकणच्या विकासानं आजपासून भरारी घेतली आहे. या विमानतळामुळं अनेकांना लाभ होणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी नारायण राणे म्हणाले की, आज आनंदाचा क्षण आहे. अशा क्षणी कुठलंही राजकारण नको. आपण जावं, शुभेच्छा द्याव्या या हेतूने मी इथं आलो आहे. विमान पाहिले आणि खूप बरं वाटलं. देश विदेशातून पर्यटक सिंधुदुर्गात यावे आणि व्यवसाय वाढून आर्थिक समृद्धी व्हावी असं वाटतं, असे राणे म्हणाले.
दरम्यान, एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले उद्धव ठाकरे आणि नारायण राणे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उजव्या बाजूला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची खुर्ची लावण्यात आली होती तर डाव्या बाजूला उपमुख्यमंत्री पवार बसले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी उड्डान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने उपस्थित होते. निमित्त चिपी उद्घाटनाचे असले तरी दोघांनीही एकमेकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीका केली.