पंढरपूर – करोनाच्या साथीत आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व यंत्रणा काम करत आहेत.
या साऱ्यांच्या कामाचा परिपाक म्हणून आपण या साथीवर मात करीत आहोत. यापुढेही संभाव्य तिसऱ्या लाटेत जबाबदारीने काम करून करोनाचा मुकाबला करूया, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
आषाढी वारीनिमित्त शासकीय महापूजेनिमित्त मुख्यमंत्री ठाकरे यांचे पंढरपुरात आगमन झाल्यावर शासकीय विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या.
मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील करोना परिस्थिती, ऑक्सिजन, लसीकरण आणि संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली.
सोलापूर जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे. प्रशासन, आरोग्य विभागाने पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत उल्लेखनीय काम केले आहे, मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत सतर्कता बाळगा. जिल्ह्यात टेस्टिंग आणि ट्रिटमेंटवर भर द्या. नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या. ऑगस्ट, सप्टेंबरपासून लसीचा पुरवठा सुरळोत होईल.
ऑक्सिजनची उपलब्धता आणि लागणारी गरज याचे योग्य नियोजन करा. ऑक्सिजनचा अधिक साठा करण्यावर भर द्यावा. अर्थचक्र थांबू नये म्हणून करोनाचे नियम पाळून उद्योग-धंदे सुरू आहेत. कामगारांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या तसेच खाजगी दवाखान्यातून लस घेण्यास परवानगी दिली असल्याने उद्योगांनी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावर अधिकाधिक भर द्यावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कोविड झालेल्या रूग्णांच्या लसीकरणाचे योग्य नियोजन आणि म्युकरमायकोसिसबाबत सतर्कता बाळगावी.तसेच औषधाचा पुरेसा साठा, इंजेक्शनची कमतरता पडणार नाही, याचीही काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.