भोपाळ – मध्य प्रदेशात पुन्हा भारतीय जनता पार्टीचे सरकार आले तर प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी दिली जाईल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते शिवराजसिंह चौहान यांनी दिले आहे.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून, कॉंग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात जोरदार लढत होणार आहे. भाजप सरकारच्या काळात युवकांना रोजगार देण्यात अपयश आल्याच्या मुद्द्यावरून शिवराज सरकारला कॉंग्रेसकडून लक्ष्य केले जाते आहे.
आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी यांनीही बेरोजगारीच्या विषयावरून भाजपवर टीका केली आहे. त्या पार्श्वभूमीवर कुटुंबातील एका सदस्याला नोकरीचे आश्वासन शिवराज यांनी दिले असून, ते महत्त्वाचे मानले जाते आहे. राज्यातील सगळ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणार असून, रोजगारासाठी कोणाला बाहेर जावे लागणार नाही.
स्वयंसहायता योजनेच्या माध्यमातून किंवा उद्यम क्रांती योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी दिली जाईल, असे शिवराजसिंह चौहान यांनी आदिवासी बहुल अलीराजपूर येथील एका सभेत बोलताना सांगितले.