मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं 16 नोव्हेंबरला मुंबईत आणण्यात येणार आहेत. मात्र केवळ तीन वर्ष ही वाघनखं महाराष्ट्रात ठेवली जाणार असून त्यानंतर पुन्हा लंडनला पाठवली जाणार आहेत. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने ही वाघनखं आणली जाणार आहेत. या वाघनखांच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी 1659 मध्ये अफझल खानाचा कोथळा काढला होता.
राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “छत्रपती शिवरायांची वाघनखं महाराष्ट्रात कायमस्वरुपी आणण्यासाठी आम्ही ब्रिटन सरकारला प्रस्ताव दिला आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला जी 350 वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने शिवरायांशी संबंधित ज्या पवित्र वस्तू आहेत त्या परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पहिल्यांदा ते एक वर्षासाठी म्हणाले होते, आता ते तीन वर्षांसाठी देत आहेत. आपला प्रयत्न असा आहे की ती वाघनखं कायमस्वरुपी इथे यावीत. या बदल्यात वाघाची एक जोडी आम्ही लंडनला देऊ. वाघनखांबाबत प्राथमिक चर्चेतून निर्णय होईल. छत्रपती शिवरायांची जगदंब तलवारही आणण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत.”
असा असेल वाघनखांचा प्रवास –
16 नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे मुंबईत आणण्यात येणार आहेत. 17 नोव्हेंबरला साताऱ्यातील वस्तूसंग्रहालयात स्थापना करण्यात येईल. 17 नोव्हेंबर ते 24 ऑगस्ट 2024 पर्यंत ही वाघनखं साताऱ्यात प्रदर्शनासाठी ठेवली जातील. 15 ऑगस्ट 2024 ते एप्रिल 2025 पर्यंत नागपूरच्या संग्रहालयात असतील. आणि एप्रिल 2025 ते नोव्हेंबर 2025 कोल्हापूरातील संग्राहलयात ठेवली जातील. नोव्हेंबर 2025 ते नोव्हेंबर 2026 मुंबईत प्रदर्शनासाठी ठेवली जातील. 16 नोव्हेंबरला वाघनखं पुन्हा लंडनला पाठवली जाणार आहेत.
आदित्य ठाकरे काय म्हणाले ?
इंग्लंडहून छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं येत आहेत. परंतु ही वाघनखं कायमस्वरुपी आपल्याकडे राहणार आहेत का? याबाबत प्रश्नच आहे. कारण ती वाघनखं केवळ तीन वर्षांसाठी आपल्याकडे राहतील, असंही जीआरमध्ये म्हटलं. मुळात ती शिवकालीन आहेत का? असा प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.