मुंबई – लोकसभा सचिवालयामार्फत ८४ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद आणि ६० वी सचिव परिषद विधान भवनात पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्षांची ‘लाडके आणि व्हिजनरी अध्यक्ष राहुल नार्वेकर’ म्हणत कौतुकचा वर्षाव केला. त्यांच्या या विशेषणामुळे सभागृहातील सर्वच लोकांच्या भुवया उंचावल्या. निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी केलेले जाहीर कौतुक हा चर्चेचाच विषय बनला आहे.
मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत एका कार्यक्रमात बोलताना ही परिषद मुंबईत व्हावी असे म्हटले होते. तो दिवस आज आला. २१ वर्षानंतर परिषद महाराष्ट्रात होतेय, ही आनंदाची गोष्ट आहे. कालच देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा झाला. आपण लोकशाही मजबूत करत आहोत.
विधिमंडळाच्या कामात तांत्रिक आधुनिकता आणणे यावर परिषदेत चर्चा होईल. महाराष्ट्र विधिमंडळाचे कामकाज पेपरलेस करण्याचे काम सुरू आहे. विधिमंडळात लॅपटॉप वापरले जात आहेत. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे दोघेही चांगले काम करत आहेत, असेही शिंदे म्हणाले.
विधिमंडळाची भूमिका लोकशाहीत महत्त्वाची राहिलेली आहे. भारतीय स्वातंत्र्य युद्धात महाराष्ट्राचे अनेक सुपुत्र होऊन गेले. गणेश मावळणकर पहिले लोकसभा अध्यक्ष होऊन गेले. महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन आहे. विधिमंडळ मजबूत करण्यास पीठासीन अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. परस्परांशी संवाद लोकशाहीत आवश्यक आहे. विधिमंडळ अधिक मजबूत आणि लोकाभिमुख व्हावे यासाठी परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यानी व्यक्त केली.
‘हमारे इरादे अटल हैं, बुलंद हैं’
विधिमंडळाचे पावित्र्य राखले जाणे आवश्यक आहे. लोक या सर्व बाबींकडे काळजीपूर्वक नजरेने पाहतात. लोकांचा या संस्थांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचे जे बदलते चित्र आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातील सर्वाधिक लांबीच्या सागरी सेतूचे लोकार्पण झाले. परिषदेसाठी आलेल्या मंडळींना अटल सेतू दाखवा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी नार्वेकरांना केली. हमारे इरादे अटल हैं, बुलंद हैं असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणाचा शेवट केला.