लखनौ – व्हीआयपी व्यक्तींसाठी ठेवण्यात आलेला हज यात्रेचा कोटा काढून टाकण्याच्या केंद्राच्या अलीकडील निर्णयाचे मुस्लिम धर्मगुरूंनी स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, यामुळे यात्रेकरूंमधील भेदभाव संपेल. आगामी हज यात्रेसाठी नोंदणी एक-दोन दिवसांत सुरू होईल.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की ‘व्हीआयपी संस्कृती’ समाप्त करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पाचा एक भाग म्हणून कोटा समाप्त करण्याचे पाऊल उचलले गेले आहे.
उत्तर प्रदेश राज्य हज समितीचे अध्यक्ष मोहसीन रझा यांनी पीटीआयला सांगितले की, “हे नक्कीच स्वागतार्ह आणि सकारात्मक पाऊल आहे कारण इस्लाममध्ये कोणत्याही व्हीआयपी संस्कृतीला स्थान नाही. अल्लाहच्या दरबारात सर्वजण समान आहेत.
यावर्षी 1,75,025 हज यात्रेकरूंपैकी सुमारे 31,000 उत्तर प्रदेशातील असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशातील यात्रेकरूंची संख्या सुमारे 8,700 होती.
केंद्राच्या या निर्णयाचे स्वागत करताना, लखनौचे प्रमुख मुस्लिम धर्मगुरू आणि ईदगाह इमाम मौलाना खालिद रशीद फरंगी महाली यांनी हा सकारात्मक निर्णय असल्याचे म्हटले आहे. यामुळे भेदभाव संपुष्टात येईल. हज यात्रेकरूंची संख्या वाढेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जर एखाद्याला सर्वशक्तिमान देवाच्या घरी जायचे असेल, तर त्याला कोणत्याही स्रोताची गरज नाही किंवा कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले.
Delhi : अन्… ‘आप’चे आमदार गोयल यांनी विधानसभेत दाखवली नोटांची बंडले
ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डाचे सरचिटणीस आणि प्रवक्ते मौलाना यासूब अब्बास यांनीही केंद्राच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. हज आणि नमाज यांच्यात तुलना करताना, बरेलीस्थित अला हजरत दर्गाहचे माध्यम समन्वयक नासिर कुरेशी यांनी सांगितले की, इस्लामच्या प्रथेप्रमाणे नमाज साठी कोणताही व्हीआयपी कोटा नसतो. त्याच प्रमाणे हज यात्रेसाठीही हा कोटा ठेवण्याची गरज नाही. तथापि, भारतीय हज समितीचे अध्यक्ष ए पी अब्दुल्लाकुट्टी यांच्याकडून या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.