प्रभात वृत्तसेवा
पुणे – केंद्रीय ऑनलाइन प्रवेश पद्धतीद्वारे इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यातील पहिल्या प्रवेश फेरीतील संभाव्य गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर करण्यात येणार आहेत. दरम्यान प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राधान्यक्रम नोंदवण्याबाबत अर्जाचा भाग-2 भरण्याची प्रक्रियाच पूर्ण केली नसल्याचे आढळून आलेले आहे.
अकरावी प्रवेशासाठीची “सीईटी’ रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर तत्काळ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. पहिल्या नियमित प्रवेश फेरीच्या वेळापत्रकानुसार अंमलबजावणीही सुरू झालेली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील एकूण 310 कनिष्ठ महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी नोंदणी केली असून, प्रवेशाच्या 1 लाख 10 हजार 765 जागा उपलब्ध करून दिल्या आहेत.
प्रवेशासाठी एकूण 75 हजार 541 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून, यातील 66 हजार 797 विद्यार्थ्यांचे अर्ज भरून लॉकही झालेले आहेत. 65 हजार 929 अर्जांची पडताळणीही पूर्ण झालेली आहे. कनिष्ठ महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम 58 हजार 83 विद्यार्थ्यांनी नोंदवला आहे. प्रवेश अर्जाचा भाग-2 भरण्यासाठीची मुदत संपली आहे.
प्रवेशासाठी अर्ज नोंदणी केलेल्या सर्वच्या सर्वच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरलेले नाहीत. येत्या बुधवारी (दि.25) पहिल्या प्रवेश फेरीची अंतिम गुणवत्ता जाहीर होणार आहे.