नगर – हिवाळा सुरु झाल्यानंतर राज्यात म्हणावी तशी थंडी नव्हती. मात्र जानेवारीच्या सुरुवातीपासूनच तापमान घसरण्यास सुरुवात झाली. हिमालयातून येणाऱ्या शीतलहरींमुळे राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. नगरचे तापमान 9.7 अंश सेल्सीअसपर्यंत खाली आले असून नगरकरांना खऱ्या अर्थाने गारठवले आहे. कमाल तापमानाचा पारा घसरल्याने उन्हातही नगरकर गारठा अनुभवत आहेत.
रात्री तापमानात आणखी घट होत असल्याने सायंकाळी लवकरच रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळतो.
त्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातही ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र पाहवयास मिळते. चहाच्या दुकानांतही गर्दी वाढली आहे. दिवसभर उबदार कपडे घातलेले नागरिक पाहायला मिळतात. महाराष्ट्रासह मुंबईतही तापमान 14.5 अंशापर्यंत घसरले असून हा मुंबईत थंडीचा 10 वर्षामधील विक्रमी निचांक आहे. तर राज्यात नाशिकमधील निफाड येथे 2.4 इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. ही राज्यातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद आहे.
काल निफाडमध्ये 9.4 अंश सेल्यियस इतके तापमान होते. काही तासांमध्येच पारा तब्बल 7 अंशांनी घसरला आहे. नाशिकमधील निफाडनंतर धुळ्यामध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. धुळ्यामध्ये पारा 5 अंशाहून खाली घसरला आहे. मुंबईत कुलाबा येथे 14.5 इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली असून सांताक्रुझ येथे 11.4 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.
मुंबईत सुरु झालेली थंडी 17 जानेवारीपर्यंतच तशीच राहिस असे भारतीय हवमानशास्त्र विभागाने सांगितले आहे. नगर शहरात सकाळी अनेक नागरिक मॉर्निग वॉकसाठी रोज जात असतात. परंतु सध्या थंडीचा जोर वाढल्याने अनेक नागरिक उबदार कपडे घालून मॉर्निग वॉकसाठी जात आहेत.