नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायद्याला देशभरातून विरोध होतोय. अनेक विचारवंत, उद्योजक आणि विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी या कायद्याविरोधात आवाज उठवला असतानाच मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ सत्या नाडेला यांनीही सोमवारी सिएए बाबत चिंता व्यक्त केली होती. “माझ्या मते भारतात सध्या जे काही सुरु आहे ते दु:खद आहे. परिस्थिती वाईट आहे,” असं मत नाडेला यांनी ‘बझफीड’चे संपादक बेन स्मिथ यांच्याशी बोलताना व्यक्त केली होती.
त्यानंतर सत्या नाडेला यांनी आणखी एक निवेदन दिले त्यामध्ये “भारत हा असा देश हवा जिथे बाहेरच्या देशातील व्यक्तीने येऊन त्याची कंपनी सुरु करेल आणि त्याचा फायदा भारतीय समाज आणि अर्थव्यवस्थेला होईल,” अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
सत्या नाडेला यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘प्रत्येक देशाने आपल्या सीमा निश्चित करुन राष्ट्रीय सुरक्षेचे संरक्षण केले पाहिजे आणि त्यानुसार स्थलांतरितांचे धोरण निश्चित केले पाहिजे. लोकशाहीमध्ये, अशी एक गोष्ट आहे ज्यावर जनता आणि नंतर सरकारे त्यांच्या हद्दीत वादविवाद करतील आणि परिभाषित करतील.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे खासदार मीनाक्षी लेखी यांनी मंगळवारी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांना लक्ष्य केले आणि म्हटले आहे की सुशिक्षित लोकांना शिक्षित करण्याची गरज आहे. नाडेला यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) हे भारतासाठी चुकीचे असल्याचे वर्णन केले असून त्यानंतर भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “साक्षर लोकांना शिक्षित करणे आवश्यक आहे” “सीएए आणण्याचे उद्दीष्ट म्हणजे बांग्लादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातल्या छळ झालेल्या अल्पसंख्याकांना संधी उपलब्ध करून देणे.”