नगर – पोलीस दलाची नोकरी अतिशय खडतर आहे. अधीकारी-कर्मचारी हे वर्दीवर असो वा नसो ते त्यांची ड्यूटी बजावत असतात. सर्वसामन्य नागरिक सण साजरे करत असतात त्यावेळी पोलीस आपली ड्यूटी बजावत असतो. तसेच ज्या व्यक्तींवर कारवाई केली जाते तेच व्यक्ती पोलीस प्रशासनाबाबत गैरसमज पसरवत असतात. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर बळी न पडता पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवा असे प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी केले.
पोलीस रेझींग डे दिना निमीत्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत सर्व सामन्य जनतेमध्ये संवेदनशीलता निर्माण व्हावी. पोलीस व जनतेमध्ये जवळीक वाढवावी, पोलीस विभागाचे विविध सामाजिक उपक्रम जनतेमध्ये पोहचावेत म्हणून पोलीस स्थापना दिनानिमीत्त अहमदनगर पोलीस दलामार्फत मांजरसुंभा गडावर शनिवार (दि.4) रोजी सकाळी सहावाजता ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, अजित पाटील, पोलीस निरीक्षक विकास वाघ, अविनाश मोरे, प्रवीण पाटील, आदीसंह सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कोतवाली, भिंगार कॅम्प, एमआयडीसी, शहर वाहतूक शाखा, मुख्यालयातील कर्मचाऱ्यांसह सामाजिक संस्था, विद्यार्थी मोठ्या संख्येने सभागी झाले होते.
यावेळी मांजुरसुंभा गडाचे पायथ्याशी भल्यासकाळी धुक्याचे मनोहरी वातावरणात वॉर्मअप करुन ट्रेकींगला सुरवात करण्यात आली. सर्वांपुढे सोपा व अवघड अशा दोन मार्गांचा पर्याय देण्यात आला होता. अशावेळी अनामप्रेम संस्थेच्या दहा दिव्यांग विद्यार्थांनी अवघड रस्ता निवडला. जिथे धडधाकट माणसांना या रस्ताने ट्रेकींग करणे अवघड जाते तिथे ज्यांना दृष्टी नाही, जे सरळ रस्ता ही दबकत चालतात ते आज दगड धोंडयातुन अनोळखी अशा दुर्गम रस्तावरुन पोलीसांसोबत चालण्याचे धाडस करत होते. अखेरीस त्यांनी झपाझप अंतर कापत मांजरसुंबा गड मोहिम फत्ते केल्याने सर्वांनीच त्यांचे कौतुक केले.