राजगुरूनगर, {रामचंद्र सोनवणे} – खेड तालुक्याची राजधानी असलेल्या राजगुरुनगर शहरातील पाणी, गटार, कचरा आणि आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. असे असताना आता लोकसभा निवडणूकीचे वारे वाहत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या नेत्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.
निवडणुकीत मतांसाठी या प्रश्नाचे भांडवल करणारे नेते याबाबत पुन्हा निवडणुकीला सामोरे जात नागरिकांची मतदारांची दिशाभूल करीत आहेत. शहरात आतापर्यंत नेते उमेदवार यांचे दौरे झाले; मात्र या प्रश्नांकडे त्यांनी गांभीर्याने पाहिले नाही तर नागरिकांनी व त्यांच्या नेत्यांनी त्यांना तसे निदर्शनास आणून दिले नसल्याने यावेळीही मतांच्या राजकारणात राजगुरुनगर शहराचे प्रश्न प्रलंबितच राहणार आहेत, असे सध्याचे चित्र आहे.
खेड तालुका हा प्रकल्पग्रस्त तालुका म्हणून उदयास आला आहे. तर दुसरीकडे चाकण, आळंदी आणि राजगुरूनगर शहरातील लोकसंख्या वाढल्याने बकालपणा आला आहे. पुणे शहराच्या नजीक असलेल्या या तीन मोठ्या शहरात नगर परिषदा कार्यान्वित आहेत. येथे पाणी वीज, आरोग्य गटार रस्ते आणि कचरा प्रश्न गंभीर बनत चालले आहेत. वर्षानुवर्षे असेच सुरु आहे.
निवडणुकांमागून निवडणुका येत आहेत. नेते, मंत्री आश्वासने देत आहेत; मात्र प्रत्यक्षात हे प्रश्न सुटत नाहीत. खेड तालुक्यात रस्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे; मात्र पाणी, आरोग्य, कचरा हे दैनंदिन जीवनातील प्रश्न अद्यापही सुटले नाहीत. राजकारणात एकमेकाला शह काटशह देताना अनेक गावांत पाणीयोजना झाल्या; मात्र ऐन उन्हळ्यात त्या गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. मग या कोट्यवधी रुपयांच्या योजनांवरील खर्च पाण्यातच गेला आहे.
योजना करताना त्याचे नियोजन झाले नाही, केवळ ठेकेदारांचे भले झाले आहे. बोगस आणि निकृष्ट कामे झाल्याने अनेक गावे तहानलेली राहिली आहेत. राजगुरुनगर शहरात काँक्रीटचे रस्त्यांचे जाळे तयार झाले आहे मात्र गटाराचे नियोजन पाणी योजनेचे नियोजन नसल्याने काँक्रीटचे रस्ते फोडण्याची वेळ येणार आहे. रस्ते करताना रस्त्याच्या दोन्ही बाजू भरल्या जात नाहीत. पाणी लाइन तोडल्या त्या जोडल्या जात नाहीत. गटार व्यवस्थापन पाहिलं जात नाही. त्यामुळे भविष्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.
पाणीप्रश्न सुटेना
वर्षानुवर्षे शहरातील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. अनेकांनी पत्रकार परिषदा घेत पाणी देण्याचे श्रेय घेतले. सर्वसामान्य नागरिक मात्र पाण्यासाठी झगडत आहे. विकतचे पाणी घेणे त्याच्या नशिबी आले आले आहे. राजगुरुनगर शहराच्या विकासासाठी आता महायुतीचे उमेदवार सरसावले आहेत. शहरातील विकासाच्या आड येणारे नेते मंडळी एक झाली असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा आहेत.
चासकमान धरणातून राजगुरुनगर शहराला पाणी पुरवठा कधी होणार यासाठी आतापर्यंत कोणतेच ठोस निर्णय होत नाही. अधिकारी वर्ग प्रत्यनशील आहे परंतु वरिष्ठ पातळीवरून निर्णय होत नाहीत राजकारण आडवे येत असल्याने राजगुरुनगर शहराचा पाणी प्रश्न सुटण्यास उशीर होत आहे.
केवळ आश्वासनांची खैरात
राजगुरुनगर शहरातील पाणी योजना प्रशासकीय इमारत गटार योजना यामध्ये राजकारण झाले. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यातील राजकीय संघर्षामुळे विकास कामे रखडली होती. आता हे दोन्ही नेते एकत्र आले आहेत.
विकास कामात अडथळे येणार नाहीत, अशी ग्वाही देत आहेत; मात्र ते मनाने एकत्र आहेत की केवळ निवडणुकीतील मते घेण्यासाठी असे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडले आहेत. तर दोन्ही नेत्यांकडून बैठका घेत तालुक्यातील प्रश्न निवडणुकीनंतर सोडवण्याची आश्वासने मात्र दिली जात आहेत.