पिंपळे गुरव – पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सहभाग घेतला आहे. स्वच्छ शहर स्पर्धेत पिंपरी चिंचवड महापालिका देशात प्रथम स्थानी आणण्यासाठी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. तसेच इंदोर पॅटर्न राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार उद्योगनगरी कचराकुंडीमुक्त करण्याचे नियोजन महापालिका आयुक्तांनी केले आहे. परंतु स्मार्ट सिटीतील नागरिक मात्र या योजनेकडे पाठ फिरवत पदपथांवर कचरा टाकत आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिका आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून शहरात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शहर स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी महापालिकेच्या वतीने मध्य प्रदेशातील इंदौर पॅटर्न महापालिकेत राबविण्यासाठी अभ्यासदौरे केले. तेथील प्रकल्प आपल्याकडे राबविण्यासाठी महापालिका आयुक्तांनी कचराकुंडी मुक्तीचे आदेश दिले. त्यानुसार शहरातील ठिकठिकाणच्या कचराकुंडी हटविण्यात आल्या आहेत. तसेच मोठ्या सोसायट्यांना कचरा विलगीकरण करून सोसायटीमध्ये कंपोस्टबिन राबविण्याचे आदेश दिले आहेत.
तर इतर नागरिकांनी आपल्या घरातील ओला, सुका आणि घातक कचरा विलगीकरण करून महापालिकेच्या घंटागाडीमध्ये देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार नागरिक कचरा विलगीकरण करून गाडीमध्ये देत आहेत. परंतु महापालिकेच्या घंटागाड्या दररोज वेळेत येत नाहीत. त्यामुळे नोकरदार वर्गाला सकाळी कामावर गेल्यानंतर घरातील कचऱ्याचे काय करायचे हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ते कामावर जाताना अडबाजूच्या रस्त्याने व वर्दळ कमी असणाऱ्या रस्त्याच्या पदपथावर कचरा टाकत आहेत. त्यामुळे पिंपळे गुरव परिसरातील मयुर नगरी चौक, कांकरिया गॅस गोडाऊनच्या बाजूला दररोज मोठ्या प्रमाणात कचरा आढळून येत आहे. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
तसेच मोकाट कुत्री व जनावरांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. त्यामुळे महपालिका प्रशासनाने शहर कचराकुंडीमुक्त करण्यापूर्वी तयार होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आणि सर्व नागरिकांना कचरा टाकता येईल अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे, अशी मागणी अण्णा जोगदंड, विकास शहाणी, मीना करंजावणे, संगीता जोगदंड, गजानन धाराशिवकर, मुरलीधर दळवी यांनी केली आहे.
सकाळ, सायंकाळी पाठवावी घंटागाडी
शहरातील बहुतांश कुटुंबातील स्त्री-पुरुष नोकरी करत आहेत. काही कुटुंबातील सदस्य सकाळीच कामावर जाताना घंटागाडी आली नाही तर ते घरातील कचरा कामावर जाताना रस्त्यात कुठेतरी कचरा टाकून पुढे जात आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरात सकाळ आणि सायंकाळी दोन वेळेस घंटागाड्या पाठवून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी.