बीजिंग – वातावरण बदलाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत कोळशाच्या वापरासंदर्भात भारताने प्रस्ताव दिल्याप्रमाणे कोळशाचा वापर पूर्णपणे थांबवण्याऐवजी टप्प्याटप्प्याने कमी करण्याला चीनने पाठिंबा दिला आहे.
कोळशाचा पहिल्यांदा वापर करणे थांबवावे आणि विकसनशील देशांना हरित तंत्रज्ञानासाठी अर्थसहाय्य करण्याची सूचना चीनने केली आहे. “कोप 26′ या परिषदेच्या अखेरच्या दिवशी करण्यात आलेल्या जाहीरनाम्यानुसार चीनने ही भूमिका स्पष्ट केली आहे. ग्लासगो येथील आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप शनिवारी झाला. त्यामध्ये 200 देशांनी याबाबतचा ठराव स्वीकारला आहे.
कार्बन उत्सर्जन कमी करणे हे सर्व देशांचे उद्दिष्ट आहे. याच उद्दिष्टासाठी सर्व देश कार्य करत आहेत, असे चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजान यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. अंतिम ठरावाचा मसुदा सौम्य का करण्यात आला हे चीन आणि भारताने विकसनशील देशांना सांगितले पाहिजे, अशी अपेक्षा परिषदेचे अध्यक्ष आलोक शर्मा यांनी व्यक्त केली होती. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
ऊर्जा प्रणालीतील सुधारणा आणि कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे ही एक प्रक्रिया आहे. विविध देशांमधील परिस्थितीचा मान राखून ही भूमिका स्वीकारली पाहिजे, असेही झाओ यांनी सांगितले.