बीजिंग – भारतीय विद्यार्थ्यांना पुन्हा येण्याची परवानगी देण्यास चीन राजी झाला आहे. आतापर्यंत भारतीय विद्यार्थ्यांबाबत आडमुठी भूमिका घेणारा चीन अखेर शहाणपणाचे पाऊल उचलणार आहे.
चीनमध्ये डिसेंबर 2019 मध्ये करोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे चीनमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परतावे लागले. करोना संकटामुळे चीनने विमान उड्डाणांवर आणि व्हिसावर निर्बंध घातले. त्यामुळे भारतीय विद्यार्थी दोन वर्षे मायदेशीच अडकून पडले. आतापर्यंत त्यांना ऑनलाईन शिक्षणावरच अवलंबून रहावे लागले.
प्रत्यक्ष शिक्षणासाठी चीनमध्ये परतण्याची परवानगी मिळण्याची मागणी त्यांनी वारंवार केली. भारत सरकारनेही तो विषय चीनकडे उपस्थित केला. मात्र, बराच काळ चीन ढिम्मच होता. अखेर शुक्रवारी काही भारतीय विद्यार्थ्यांना परतण्याची परवानगी देण्याची तयारी त्या देशाने दर्शवली.
चीनमध्ये शिक्षण घेणारे 23 हजारहून अधिक भारतीय विद्यार्थी मायदेशात अडकून पडल्याची प्राथमिक माहिती आहे. त्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश जण चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे आहेत. आता चीनच्या निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळू शकेल.